मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांच्यासह काँग्रेसवर आर्थिक गैरव्यहाराचे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी ईडीने गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान संजय रूट यांनी बोलताना, ईडीने पंतप्रधानांचं, एका जबाबदर व्यक्तीचं हे वक्तव्य अधिकृत जबाब मानून या मनी लॉन्डरिंग प्रकरणाचा तपास करावा, तसेच अदाणींसह अंबानींना अटक करावी, अशी मागणी केली आहे. संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी केली आहे. राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तेलंगणातील दोन प्रचारसभांचा दाखला दिला. तसेच या संभाद्वारे मोदी यांनी पहिल्यांदाच अदाणी आणि अंबानींचा जाहीरपणे उल्लेख केला असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत बोलताना, भारतीय व्यावसायिक गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यावर थेट आरोप केले होते. त्यांनी प्रथमच उघडपणे असे आरोप केल्याने, मोदींच्या वक्तव्याचा आधार घेऊन ईडीने कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.

अदानी-अंबानींनी राहुल गांधींना काळा पैसा पुरवला
संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या (बुधवार, 7 मे) दोन सभांमध्ये काँग्रेस पक्षावर टीका केली. ती टीका करत असताना त्यांनी एक आरोप केला. ते म्हणाले, उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या काळ्या पैशावर काँग्रेस (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) ही लोकसभा निवडणूक लढवत आहे. या दोन उद्योगपतींनी राहुल गांधी यांना टेम्पो भरुन काळा पैसा पुरवला आहे. हे देशाच्या पंतप्रधानांचं वक्तव्य आहे. त्यामुळे त्याची दखल घेऊन ईडीने अदानी-अंबानींना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

पंतप्रधान मोदी आता स्वत: च्याच अर्थदात्यांवर हल्ला करु लागले आहेत. अदानी आणि अंबानी हे भाजपाचे अर्थदाते आहेत. त्यांच्यावरच आता मोदी आरोप करु लागले आहेत. याचा अर्थ ते या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच एखाद्या ठिकाणी अंबानी आणि अदानी यांचं नाव घेतलं आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, असं राऊत म्हणाले.

देशाचे पंतप्रधान सांगत आहेत की, गौतम अदानी आणि मुकेश अंबांनी यांचा काळा पैसा टेम्पो भरुन काँग्रेसकडे जात आहे. त्या पैशावर काँग्रेस निवडणूक लढत आहे. याचा अर्थ असा आहे की मोदींना या भ्रष्टाचाराची, या गैरव्यवहाराची माहिती आहे. हे पीएमएलए अंतर्गत मनी लॉन्डरिंगचं प्रकरण आहे. त्यामुळे मोदी यांनी सक्तवसुली संचालनालयाला सांगून या दोन उद्योगपतींना अटक केली पाहिजे. त्यांच्यावरच कारवाई केली पाहिजे, अशीही मागणी राऊतांनी केली आहे.