अहमदाबाद (विश्लेषण) : सत्तावीस वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही भाजप गुजरातमध्ये सत्तेत आली आहे. २७ वर्षे सत्तेत राहिलेल्या भाजपला सत्तेतून बाहेर घालवण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. गुजरातमध्ये भाजपने रेकोर्डब्रेक विजय मिळवला आहे.

काँग्रेसला अत्यंत कमी म्हणजे फक्त १९ जागांवर विजय मिळाला आहे. शिवाय काँग्रेसची मतांची टक्केवारी निम्म्याहून अधिक झाली आहे. गुजरातच्या इतिहासातील काँग्रेसचा हा सर्वात मोठा पराभव आणि भाजपचा सर्वात मोठा विजय असल्याचे मानले जात आहे. त्यामागे काही राजकीय गणित असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४९ टक्के मते मिळाली होती. आता या मतांच्या टक्केवारीत ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजे भाजपच्या मतांचा टक्का आता ५४ टक्के झाला आहे. मागच्यावेळी भाजपचे ९९  उमेदवार निवडून आले होते. यावेळी भाजप १५३ हून अधिक जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे २७ वर्ष सत्तेत राहूनही भाजपला अँटी इन्कंबन्सीचा सामना करावा लागलेला नाही. उलट अपेक्षेपेक्षा मोठा विजय भाजपला मिळाला आहे.

या निवडणुकीत आपला १३ टक्के मते मिळाली आहेत. आपचे सहा उमेदवार आघाडीवर आहे. याचा अर्थ पंजाबनंतर आता आपने गुजरातमध्येही चंचूप्रवेश केला आहे. १३ टक्के मते मिळणे आणि ६ जागांवर उमेदवार आघाडीवर असणं ही आपसाठी मोठी गोष्ट आहे. शिवाय या मतांच्या बेगमीमुळे आपचा राष्ट्रीय पक्ष बनण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला ४१ टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत काँग्रेसला निम्मी म्हणजे फक्त २१ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसचे गेल्या निवडणुकीत ७७ आमदार निवडून आले होते. या निवडणुकीत फक्त १९ आमदार निवडून येताना दिसत आहेत. काँग्रेससाठी हा मोठा फटका बसला आहे.

काँग्रेसच्या गुजरातमधील पराभवाची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे गुजरातमध्ये काँग्रेसकडे चेहरा नव्हता. काँग्रेसकडे स्टार कॅम्पेनरही नव्हता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरातमध्ये मोजक्याच सभा झाल्या. ते भारत जोडो यात्रेत सहभागी होते. प्रियंका गांधी यांच्याही सभा झाल्या नाहीत. आजारपणामुळे सोनिया गांधीही गुजरातकडे फिरकल्या नाहीत. त्याशिवाय काँग्रेसचे इतर नेते गुजरातमध्ये प्रभाव पाडू शकले नाहीत. काँग्रेस प्रचारात सुरुवातीपासूनच पिछाडीवर होती. त्याबाबत भाजप आधीपासूनच वरचढ होती. गेल्या पाच वर्षात काँग्रेसमधून १९  आमदार फुटून भाजपमध्ये गेले. त्याचा फटकाही काँग्रेसल बसला. हार्दिक पटेल यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

गुजरात हातचे गेले म्हणजे दिल्ली हातातून जाऊ शकते. गुजरात केवळ पंतप्रधानांचे होम ग्राऊंड नाही, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचंही होम ग्राऊंड आहे. त्यामुळे होम पीचवर पराभव झाल्यास त्याची लाट अख्ख्या देशभर येऊ शकते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहीत होते. त्यामुळेच त्यांनी गुजरातमध्ये प्रचारांचा धडाका लावला होता. असा धडाका काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने लावलेला दिसला नाही.