यवतमाळ ( वृत्तसंस्था ) सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा धुमाकूळ सुरू आहे. राजकीय नेत्यांमध्ये वार- प्रतिवार सुद्धा पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपली उमेदवारी जाहीर करत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

काल दिनांक 1 एप्रिल रोजी फूल डे होता, जगात एप्रिल फूल डे म्हणून साजरा होणारा दिवस आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा होतो, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. आज पत्रकारांशी संवाद साधत असताना ते बोलत होते. यवतमाळमध्ये आज ठाकरे गटाचे स्टार प्रचारक आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे. आदित्य ठाकरे आज संजय देशमुख यांचा प्रचार करणार आहेत. यवतमाळमधून संजय देशमुख महाविकास आघाडीकडून आज अर्ज दाखल करणार आहेत.

या आधी संजय देशमुख यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, यवतमाळमध्ये प्रचार सुरु आहे, सभा होणार आहे. एनडीएकडून तिथे अद्याप उमेदवार देण्यात आलेला नाही. एनडीए कोणता भ्रष्ट उमेदवार देणार हे पाहावं लागेल.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, काल एप्रिल फूल डे होता, जगात एप्रिल फूल डे म्हणून साजरा होणारा दिवस आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा होतो. देशाचं भविष्य आपल्याला दिसत आहे. परिवर्तनाचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. दिल्ली, बिहार, झारखंड, महाराष्ट्रात तुम्हाला दिसेल की, इंडिया आघाडीची बांधणी मजबूत आहे. काही महिने, काही दिवसापूर्वी जे यांच्या विरोधात बोलत होते, त्यांनी गद्दारी केली. आता कोण-कोणत्या पक्षात आहे. सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांना दिसतंय, चित्र स्पष्ट झालं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.