मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘संपलेला पक्ष’ म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस झाले आणि चिन्हदेखील गमवण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले. म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये! ‘शिल्लकसेना’, अशी पोस्ट मनसेकडून पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगली ढवळून निघाले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष आजही महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर अखेर एकनाथ शिंदे यांना भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पद मिळाले. नुकतेच आता शिवसेनेतील काही नगरसेवक सुद्धा शिंदे गटात सामील झाले. या सगळ्या घडामोडींवरून अनेक पक्षातील नेते वारंवार आपल्या प्रतिक्रिया मांडत असतात. याचाच एक भाग म्हणून राज ठाकरेंच्या मनसे पक्षाने पोस्ट टाकून आदित्य ठाकरेंना त्यांच्या जुन्या वक्तव्यावरून चिमटा काढला आहे.

याआधी आदित्य ठाकरे यांनी मनसेला भाजपची ‘सी’ टीम असे म्हणत हिणवले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, टमनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की भाजपाची ‘सी’ टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळाले आहे. ‘बी’ टीम एमआयएम आहे आणि ‘सी’ टीम मनसे आहे. जो पक्ष गेली इतकी वर्षे आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही. त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचे? संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही, असा टोला त्यांनी मागे मनसेला लगावला होता. त्याचेच प्रत्युत्तर देत आता मनसेने आदित्य ठाकरेंना टोला लगावलेला आहे.