कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे-बंगळूर महामार्गावर कासेगावजवळील येवलेवाडी येथे थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने कारमधील पाच जण जागीच ठार झाले. ठार झालेले पाचही जण जयसिंगपूर येथील एकाच कुटुंबातील आहेत. हा अपघात आज (शनिवार) दुपारच्या दरम्यान घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

या अपघातात अरिंजय आण्णासाहेब शिरोटे (वय ३८), स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरू अभिनंदन शिरोटे (वय १०) यांचा या अपघातात मृत्यू झाला. तर पाचव्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. अरिंजय शिरोटे हे नौदलात नोकरीस होते. अपघातग्रस्त शिरोटे कुटुंबीय पिंपरी-चिंचवड येथून जयसिंगपूरकडे कारने चालले होते.