कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुईखडी घाटात कार उलटून झालेल्या अपघातात कोल्हापुरातील दोन तरुण जागीच ठार झाले, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मित्रांसमवेत पार्टी करून हे पाचही मित्र कारने कोल्हापूरला येत होते. शनिवारी रात्री उशिरा हा अपघात झाल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले.

या अपघातात शुभम हेमंत सोनार (वय २४, रा. राजारामपुरी), शंतनू शिरीष कुलकर्णी (वय २८, रा. मोरेवाडी), अशी ठार झालेल्यांची तरुणांची नावे आहेत. तसेच सौरभ रवींद्र कणसे (वय २६, रा. पिंपळेश्वर गणपती मंदिर जवळ, राजारामपुरी), संकेत बाळकृष्ण कडणे (वय २१, रा. खाडिलकर गल्ली, सांगली) या दोघांसह आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याचे नाव समजू शकले नाही. या जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.