मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या  भेटीनंतर राज्यपालांनी १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत त्यांचा निर्णय कृतीतून दाखवावा. तिथले हसरे फोटो प्रसिद्ध झाल्याने वातावरण प्रसन्न होतं असं वाटतंय. त्यामुळे येत्या काळात राज्यपाल १२ आमदारांचा निर्णय निकाली लावतील,  असं वाटतंय. तसेच राज्यपालांवर दबाव असेल, तर त्यांनी  तसेही सांगावं,  असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.  

विधान परिषदेवरील  आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्या लवकर करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांची बुधवारी भेट घेतली. या भेटीबद्दल राऊत पत्रकारांशी  बोलत होते.

राऊत म्हणाले  की, राज्यपाल दबावामुळे निर्णय घेत असतील, तर त्यांनी ते जाहीरपणे सांगावं. राजभवन आणि सरकारमध्ये आतापर्यंत संघर्ष झाल्याचा इतिहास नाही. आणि तो जर होत असेल तर तो का होतो याचा विचार राजभवनाने करायला हवा. हायकोर्टाने या प्रकरणात पडण्याची गरज नाही. मंत्रिमंडळाने दिलेल्या नावांना राज्यपालांनी मंजुरी देणे हे त्यांचे काम आहे. १२ आमदार हे तालिबानमधून आलेले नाहीत, ते गुंड नाहीत. ते कलाकार आहेत,  वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी महत्वपूर्ण काम केले आहे. त्यामुळे राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा. कालच्या भेटीनंतर राज्यपाल सकारात्मक निर्णय घेतील असं वाटतय, असे राऊत म्हणाले.