मुंबई – सध्या १८ व्या लोकसभेच्या पहिल्या संसद अधिवेशनची चर्चा सुरु आहे. अशातच शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे चर्चेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारल्यांनंतर शरद पवारांचं लक्ष आता विधानसभा निवडणुकीवर लागून राहिले आहे. त्यामुळे आता शरद पवार फुल्ल ऑन ॲक्शन मोडवर पाहायला मिळत आहे.. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. निवडणूक चिन्हाबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाने हे पत्र लिहिलं आहे. पिपाणी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळावं, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. पिपाणी या चिन्हामुळं या निवडणुकीत आम्हाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या बाबात निर्णय घ्या. अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार, असं या पत्रात म्हणण्यात आलं आहे..

काय म्हणाले शरद पवार..?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने यंदाची लोकसभा निवडणूक ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हावर लढवली. मात्र या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ चिन्ह देण्यात आलं होतं. यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं म्हणणं आहे. साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच जिंकणार होती मात्र ‘पिपाणी’ चिन्हामुळे ती जागा हातातून गेली, असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. ‘तुतारी वाजवणारा माणूस’ आणि ‘पिपाणी’ या चिन्हांमध्ये साधर्म्य आहे. यामुळे सामान्य लोकांना यातील फरक लवकर लक्षात येत नाही. यामुळे नुकसान होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसू नये म्हणून शरद पवार गटाने याबाबतचं पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील आहे..