मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका व शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. या मागणीनंतर दानवे यांच्यावर पाच दिवसांची निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता अंबादास दानवे यांच्या निलंबनात दोन दिवसांची कपात करण्यात आली आहे. उद्यापासून म्हणजे शुक्रवारपासून अंबादास दानवे सभागृहात दिसणार आहेत . अंबादास दानवे यांनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली होती. यानंतर दानवेंच्या निलंबनावर विधान परिषदेत चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

अंबादास दानवेंच्या निलंबनांच्या कारवाईसंदर्भात भाजप नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत प्रस्ताव मांडला. अंबादास दानवेंच्या निलंबन कालावधीत कपात करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

निलंबन मागे घेऊन वेगळं काही केलं नाही – दानवे

मला असं वाटतं की, निलंबन मागे घेण्यात आले. त्याला उशीर त्यांनी केला आहे. हा निलंबनाचा निर्णय मागे घेऊन खूप काही असं वेगळं त्यांनी केलं असं नाही . मी दिलगिरी व्यक्त केली होती त्यानंतर त्यांनी निलंबन मागे घ्यायला हवं होतं. तरी त्यांनी तीन दिवस यामध्ये घेतले .उद्यापासून मी सभागृहात जाईल, तसेही आता चार ते पाच दिवस उरले आहेत. मला जरी तीन दिवस सभागृहात येऊ दिलं नाही तरी मी माझा जनता दरबार सुरू ठेवला. उद्यापासून मी त्याच आक्रमकतेने विरोधी पक्षाची भूमिका मांडत राहणार आहे,असं दानवे यांनी निलंबन कपातीच्या निर्णयानंतर म्हटलं आहे.