मुंबई (प्रतिनिधी) : महावितरण कंपनीची विद्युत सहायक पद भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात आली असून कागदपत्रांची तपासणी काटेकोरपणे करण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला असेल, त्यांना नियमानुसार अपात्र घोषित करण्यात येईल, कोणत्याही उमेदवारांवर अन्याय होणार नाही, असा प्रकारे संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

फोर्ट येथील महावितरणच्या सूत्रधार कंपनीच्या इमारतीमध्ये राज्यातील निवडक विद्युत सहायक उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यावेळी उमेदवारांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन मंत्री तनपुरे यांनी उमेदवारांचे समाधान केले.

तनपुरे म्हणाले की, विद्युत सहाय्यक पदांच्या निकालाबाबत माध्यमांतून आणि समाज माध्यमातून चुकीच्या पद्धतीने प्रसार करण्यात येत होता. पण निकालात कसल्याही प्रकारची चूक झालेली नाही. सर्व निवड झालेल्या उमेदवारांची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये कट ऑफ, राखीव जागा, आरक्षण, गुणांकन आदी बाबी स्पष्ट होतील. त्यानंतर कोणाचीही शंका राहणार नाही.

भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी कागदपत्रे तपासणी करून नियुक्ती पत्रेही देण्यात येणार आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक होत आहे. सर्व उमेदवारांना न्याय मिळणार आहे. कोणीही कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तनपुरे यांनी केले. यावेळी महावितरण कंपनीचे अधिकारी आणि उमेदवारांच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.