दिल्ली : राहुल गांधींनी लोकसभेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. इनकम टॅक्स, ईडी हे सर्व लहान उद्योगपतींच्या मागे लागतात. ज्यामुळे कोट्यवधींची मालमत्ता असलेल्यांचा मार्ग मोकळा होतो. मी गुजरातमध्ये होतो तेव्हा टेक्सटाइल इंडस्ट्रीमधील लोकांनी सांगितले की मोठ्या उद्योगपतींचा मार्ग मोकळा करण्यासाठी जीएसटी आणले गेले. यावर सभागृहातील एका सदस्याने राहुल गांधींना तुम्ही कधी गुजरातमध्ये जाता का? असा सवाल केला. त्यावर राहुल गांधींनी उत्तर दिले- मी जातो. एवढ्या उत्तरावर ते थांबले नाही तर पुढे म्हणाले की, यावेळी आम्ही गुजरातमध्ये तुमचा पराभव करू, लिहून ठेवा यावेळी आम्ही गुजरातमध्ये तुमचा पराभव करू.

लोकसभेत काँग्रेसचे खासदार आणि विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं . सभागृहात राहुल गांधींनी विविध मुद्यांवरून धारेवर धरलं. अग्निवीर योजना, अयोध्या, किसान बिल आणि रोजगार अशा प्रश्नांवर राहुल गांधी यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधींनी यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केलं. शेतकऱ्यांबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले, आम्ही भूमि अधिग्रहण विधेयक तयार केले होते. ज्यामुळे त्यांना योग्य मोबदला मिळाला असता. पण त्याला तुम्ही रद्द केले. शेतकऱ्यांना घाबरवण्यासाठी तुम्ही 3 विधेयके आणली. पंतप्रधान म्हणाले की ही विधेयके शेतकऱ्यांच्या फायद्याची आहेत. पण प्रत्यक्षात त्याचा फायदा अंबानी आणि अदानी यांना होणार होता. शेतकरी रस्त्यावर आले पण तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली नाही. तुम्ही त्यांना दहशतवादी म्हणता, असा आरोपही राहुल गांधींनी केला.