इचलकरंजी (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये झालेल्या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री मिश्रा यांचा मुलाविरोधात कठोर कारवाई करावी. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांची तात्काळ सुटका करण्यात यावी. या मागणीसाठी इचलकरंजी शहर काँग्रेसतर्फे मलाबादे चौक येथे आज (मंगळवार) सायंकाळी निदर्शने करण्यात आली.

यावेळी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच घडलेल्या प्रकरणाची उच्च न्यायालया मार्फत चौकशी व्हावी. तसेच ज्यांनी हा गुन्हा केला त्या गृहमंत्र्याच्या मुलाला तात्काळ अटक व्हावी. शहिद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर केंद्र सरकारचा निषेधही व्यक्त करण्यात आला.

यावेळी इचलकरंजी काँग्रेस शहराध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक शशांक बावचकर, अजित मिणेकर, बाबासाहेब कोतवाल, पदाधिकारी, कार्यकर्त्ये उपस्थिती होते.