प्रा संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मुदाळ येथील मेळाव्याला जोरदार प्रतिसाद

भुदरगड (प्रतिनिधी ) : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आदेश आणि हसन मुश्रीफ यांचे पाठबळ याद्वारेच आम्ही या लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांना पाठिंब्याची भूमिका घेतली. जी गोष्ट पोटात, तीच आमच्या ओठात. त्यामुळे या निवडणुकीत प्राण जाये पर वचनांना जाये, असे अभिवचन माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिले.

भुदरगड येथे झालेल्या जाहीर मेळाव्यात माजी आमदार के. पी. पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांना विराट मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन करून पाठबळ देण्याचा निर्णय घोषित केला.

के. पी. पाटील म्हणाले, ही निवडणूक ग्रामपंचायत अथवा सोसायटीची नव्हे. देश कोणत्या दिशेने जाणार आहे हे ठरवणारी, जगाचे लक्ष वेधणारी अशी ही लोकसभा निवडणूक आहे. देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर नेण्यासाठी मोदींनी केलेले विशेष प्रयत्न त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे इप्सित साध्य करणार आहे. गेली ४० वर्षे आम्ही हसन मुश्रीफ यांच्याशी नेकीने मैत्री केली आहे. विरोधक वाट्टेल त्या वावड्या उठवतात. पण आम्ही कधीही जी भूमिका घेतो, त्या भूमिकेचं समर्थन शेवटच्या टोकापर्यंत करीत असतो. यापूर्वी अडचणींचा डोंगर होता, हा डोंगर देखील आम्ही लीलया पार पाडला.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना माजी आमदार के. पी. पाटील यांनी संजय मंडलिक यांना पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या निर्णयाला कलंक न लावण्याचे आवाहन करत अजितदादांचा शब्द प्रमाण माना, असेही आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी खासदार संजय मंडलिक यांना मताधिक्य देण्याचे आवाहन केले. लोकसभेच्या निवडणुकीत धनुष्यबाणाला मते द्यायची आणि विधानसभेला काय करायचं, ही चिंता अजिबात करू नका.

उमेदवार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, के. पी. यांच्या पाठिंबामुळे जिल्ह्याच्या राजकीय महाभारतामध्ये मार्गदर्शनासाठी आम्हाला श्रीकृष्ण लाभले. देशाचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असून देशाला स्थैर्य देण्यासाठी व देश बलवान करण्यासाठी या लोकसभा निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर कालावधीत देशाची विकसनशील वाटचाल काही बदलली नव्हती. रोटी, कपडा और मकानच्या पुढे विषयच सरकला नव्हता. नरेंद्र मोदी यांनी मात्र गेल्या दहा वर्षात 144 कोटी लोकसंख्येतील 80 कोटी लोकांना मोफत धान्य योजना राबवली. तब्बल 1600 च्यावर मोदी यांचे क्रांतिकारक निर्णय देशाची आर्थिक सामाजिक व राजकीय भूमिका बदलणारे घेतले आहेत. 370 कलम रद्द, तीन तलाक पद्धत रद्द, फौजदारी कायद्यात बदल असे अनेक क्रांतिकारक निर्णय मोदी यांनी घेतले. सहकारी साखर कारखानदारी मजबूत करण्याच्या दृष्टीने आपला यापुढे लोकसभा अधिवेशनात विशेष आग्रह असेल, असेही त्यांनी सांगितले.

ऋणातून उतराई होऊया……..!

पालकमंत्री मुश्रीफ भाषणात म्हणाले, मी आणि के. पी. आम्ही दोघेही स्वर्गीय खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांचे कार्यकर्ते. त्यांचे आणि भुदरगड राधकनगरी तालुक्यांच नातं जुनं आहे. बिद्री साखर कारखान्याच्या एका निवडणुकीत के. पीं. च्या विरोधात बलाढ्य पॅनल उभे असताना स्वर्गीय मंडलिक यांनी के. पीं. ना ताकद देऊन निवडूनही आणले होते. त्यांनी कालव्याला सोडलेले पाणी असेल, टाका नाल्यात टाकलेलं पाणी असेल. स्वर्गीय मंडलिक यांचे आपण काहीतरी देणं लागतो या कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांच्या ऋणातून ऋतराई होऊया.

भोग सरल, सुख येईल…..!

माजी आमदार के. पी. पाटील भाषणात म्हणाले, संजय मंडलिक यांना त्यांच्या कामगिरीवर मत द्यायला यावेळी संधी आहे. याचा आम्हाला अभिमानही वाटतो. पुढची निवडणूक, झेंडा, पक्ष आणि चिन्ह हे फक्त ‘के. पी.’ च असेल. माझ्या कार्यकर्त्यांनी खूप सोसले. के. पी. आणि राष्ट्रवादीसाठी लोकांनी सोसले. आता दिवस बदलणार आहेत. दिस येतील, दिस जातील, भोग सरल सुख येईल. यासाठीच आता संजयदादांना ताकद देऊया.

यावेळी पंडितराव केणे, विश्वनाथराव कुंभार, धनाजीराव देसाई, मधुअप्पा देसाई, के. ना. पाटील, सुनील कांबळे, बापूसो आरडे, विलास कांबळे, विकासभैय्या पाटील, शेखर देसाई, राजेंद्र देसाई, सर्जेराव देसाई, बाळासाहेब जाधव, विठ्ठलराव कांबळे, संग्राम देसाई, प्रकाश पाटील, रंगराव पाटील, दत्ता पाटील, पांडुरंग पाटील, अण्णासो पवार, संग्रामसिंह पाटील, भूषण पाटील, अभिजीत डोंगळे, सुरेश कुराडे, शाकीर पाटील, प्रा. किसन चौगुले, धैर्यशील पाटील, राजूदादा पाटील, सुरेश घोडके, भिकाजीराव एकल, शरद पाटील, अशोक पाटील, फत्तेसिंह भोसले. फिरोजखान पाटील, राजेंद्र भाटले, दीपक केसरकर, विश्वासराव पाटील, सर्जेराव पाटील, विनायक पाटील, दादासो पाटील, सचिन पाटील, संजय कलिकते, एकनाथ माने, भगवान पाटील, धनाजीराव पाटील, युवराज वारके, विश्वास पाटील, आनंदा पाटील, दत्ता निचळ, संजय पाटील, रणजीत पाटील, संजय डोंगळे, बाजीराव पाटील, भाटकाका, दीपक पाटील, सुभाष पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, बाळासो खाडे, मच्छिंद्र कांबळे, बिकाजीराव चौगुले, वसंत पाटील यांच्यासह राधानगरी व भुदरगड तालुक्यातील अनेक मान्यवर नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते