कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि त्यांना कोल्हापूर रेल्वे स्थानक तसेच रेल्वे गाड्यांबाबत मागणीचे निवेदन दिले. कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते. अशावेळी कोल्हापूर मुंबई मार्गावर तातडीने वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी आग्रही मागणी खासदार महाडिक यांनी केली.

रेल्वेचा पुणे विभाग मनमाडपर्यंत विस्तारित केल्यास कोल्हापूरहून शिर्डी साईनगर पर्यंत एखादी विशेष रेल्वे सुरू करता येईल. त्यातून हजारो भाविकांना मोठी सुविधा निर्माण होईल; याकडेही खासदार महाडिक यांनी लक्ष वेधले. सध्या मिरज ते परळी या मार्गावर डेमो ट्रेन सुरू आहे. कोल्हापूर ते सांगली दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेचे आधुनिकीकरण करावे, अशा मागण्याही खासदार महाडिक यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केले आहेत. अमृत भारत योजनेअंतर्गत सध्या कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण आणि विकसीकरण होत आहे.

त्या अंतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकावर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभारावा अशी मागणी ही खासदार महाडिक यांनी केली आहे. सध्या कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते धनबाद या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या कोल्हापुरात आल्यावर सुमारे 48 तास थांबून असतात. अशावेळी या रेल्वे गाड्या, सोलापूर किंवा कलबुर्गी मार्गावर सोडता येतील का, याचाही रेल्वे प्रशासनाने सकारात्मक विचार करावा, अशी सूचना खासदार महाडिक यांनी निवेदनातून केली आहे. या सर्व मुद्द्यांचा आणि मागण्यांचा सकारात्मक विचार करून कार्यवाही केली जाईल असे रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांनी खासदार महाडिक यांना सांगितले.