मुंबई/प्रतिनिधी : सलमान खाननंतर बिष्णोई गँगने आपला मोर्चा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडे वळविला आहे. आव्हाडांना बिष्णोई गँगने धमकी देत लाखो रुपयांची खंडणी मागितली आहे. तसेच पैसे न दिल्यास आव्हाडांचेही सलमान खानसारखे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याने आपले नाव रोहित गोदारा असे सांगितले असून हा फोन ऑस्ट्रेलियातून आल्याची माहिती आहे.

सलमान खानला धमकी दिल्यांनतर देशात पुन्हा बिष्णोई गँगची चर्चा होऊ लागली आहे. बॉलिवूड अभिनेता दबंग खान अर्थात सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्यानंतर बिष्णोई गँगने आपली भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बिष्णोई गँगच्या ज्या दोन आरोपींनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता, त्यांना मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास करण्यात येत असतानाच बिष्णोई गँगकडून महाराष्ट्रातील आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी देण्यात आली आहे.

बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई पोलीस सलमान खान प्रकरणासारखे या प्रकरणातील आरोपींना शोधून बेड्या ठोकतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे याबाबत आता पोलिसांकडून कोणती कारवाई करण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सलमान खान प्रकरणात पोलिसांकडून अधिकचा तपास करण्यात येत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर लॉरेन्स बिष्णोईचा खात्मा करणार असे म्हणाले आहेत. पण आता बिष्णोई गँगने राजकीय नेत्यांना टार्गेट केले असून याबाबत मुख्यमंत्री काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.