कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी (बी. टेक. ॲग्री) महाविद्यालयाला राज्यस्तरीय स्व. वसंतराव नाईक कृषी प्रेरणा – 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील ऍग्रोकेअर मंचच्या १७ व्या वर्धापन दिन व कृषी दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गुरुदक्षिणा ऑडिटोरियम, कॉलेज रोड, नाशिक येथे झालेल्या या कार्यक्रमात माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, रिजनरेशन प्रोजेक्ट ऑफ मेघालयचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ यांच्या हस्ते महाविद्यालयाच्यावतीने प्रा. पी.डी. उके व प्रा. पी. एस. बंडगर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, कृषी भूषण ग्रोवर्सर कंपनीचे चेअरमन भूषण निकम व आयोजक रोहिणी पाटील तसेच कृषी व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ‘अ’ श्रेणी प्राप्त असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाने अत्याधुनिक शिक्षण व संशोधन क्षेत्रामध्ये योगदान दिले आहे. महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी राज्य व केंद्र सरकारच्या विविध खात्यामध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. ३० विद्यार्थ्यांनी आयआयटी, एनआयटी, निफ्टीम यासारख्या उच्च दर्जाच्या संस्थांमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले असून १४ विद्यार्थ्यांनी इजराइलच्या हिब्रू युनिव्हर्सिटी, जेरुसलेम येथून उन्हाळी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. १७ विद्यार्थी विदेशात उच्च शिक्षण किंवा नोकरी करत आहेत, १८ हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध विद्यापीठांचे गोल्ड मेडल जिंकले आहेत.

या सर्व कामगिरीची दखल घेऊन ऍग्रोकेअर मंच, नाशिक यांच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचा “राज्यस्तरीय स्व. वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार – २०२४” देऊन गौरव करण्यात आला. सदरचा पुरस्कार हा महाविद्यालयाला मिळालेला सहावा पुरस्कार आहे. भविष्यातही हे महाविद्यालय कृषी अभियांत्रिकी व संशोधन क्षेत्रात उत्तम कामगिरी करेल असा विश्वास प्राचार्य डॉ. सुहास पाटील यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी या पुरस्काराबद्दल सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व आजी- माजी विद्यार्थ्य्यांचे अभिनंदन केले.