कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय पाहणी पथकाने अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या शिरोळ, कुरुंदवाड व नृसिंहवाडी येथील शेती पिके, घरे व दुकानांची आज (मंगळवार) पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

केंद्रीय पथकाने शिरोळ येथील ऊस शेती पिकाची पाहणी केली. येथील शेतकरी गिरीश कवळेकर व कृषी मित्र युसुफ सिकंदर किरणे व अन्य उपस्थित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी पथक प्रमुख रेवनिष कुमार यांनी संवाद साधला.

या भागातील सर्व शेती पिके किमान १० ते १५ दिवस पुराच्या पाण्याखाली होती.  ऊस वरून जरी हिरवा दिसत असला, तरी आतून पूर्णपणे नासुन गेला असून त्याला फंगस लागलेला आहे. त्याचा काढणी खर्चही करू शकत नाही, अशी कैफियत शेतकऱ्यांनी पथकातील सदस्यांसमोर मांडली.

कुरुंदवाड येथील ग्रामस्थ महेश दिवाजी जेवापे यांनी महापुरात त्यांचे घर व जनावरांच्या गोठ्यातील २ म्हशी वाहून गेल्याची माहिती दिली. तर नृसिंहवाडी मध्ये महापुरामुळे दुकानांमध्ये पाणी जाऊन विविध दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती व्यापारी संघटनेने केंद्रीय पथकाची भेट घेऊन दिली.  नियमित येणाऱ्या पुरावर वेळीच उपाययोजना कराव्यात. अलमट्टी धरणाचा विसर्ग वेळेत सोडल्यास या भागात बॅक वॉटर येणार नाही. व पूर परिस्थिती कमी होईल. त्यामुळे शासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील व्यापारी, शेतकरी व ग्रामस्थांनी केली.

या केंद्रीय पथकाचे प्रमुख वरिष्ठ सनदी अधिकारी रेवनीष कुमार, तर सदस्य नागपूर येथील जलशक्ती चे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे, नवी दिल्ली येथील ऊर्जा विभागाच्या उपसंचालक श्रीमती पूजा जैन, मुंबई येथील रस्ते परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर, सनदी अधिकारी प्रताप जाधव यांचा समावेश होता.