मुंबई (प्रतिनिधी) : भारतामधून अमेरिकेला पाठविलेला जवळपास 4 कोटी 28 लाखांचा आंबा तेथील विमानतळावरील त्रुटींमुळे स्वीकारण्यास नकार देण्यात आला आहे. अमेरिकेली यंत्रणांनी नकार दिल्याने हा सर्व नाशवंत माल तिथेच नष्ट करावा लागला असून, निर्यातदारांना नुकसान सहन करावं लागलं आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात फळमालाचं नुकसान झाल्याने परदेशात आंबा निर्यात करण्याची प्रक्रिया पुन्हा चर्चेत आली आहे.
अमेरिकेला आंबा निर्यात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकीरण केंद्र सुरू केले आहे. येथे अमेरिकन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आंब्यावर विकीरण प्रक्रिया केली जाते. याच माध्यमातून हा आंबा पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. मे महिन्यात लॉस एंजिलिस, सॅन फ्रान्सिस्को व अटलांटा विमानतळावर जवळपास 4 कोटी 28 लाख रुपयांचे आंबे तेथील प्रशासनाने स्वीकारण्यास नकार दिला. अमेरिकेत आंबा पाठवताना विकीरण प्रक्रिया केल्यानंतर आवश्यक पीपीक्यू 203 अर्जावर सह्या केल्या जातात. मात्र भारतात गेलेल्या आंब्यासंदर्भात याच कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे हा आंबा स्वीकारण्यास तेथील स्थानिक यंत्रणांनी नकार दिला.
अमेरिकेने नाकारलेला आंबा परत भारतामध्ये आणणेही खर्चिक असल्यामुळे तो सारा माल तेथेच नष्ट करावा लागला. त्यामुळे निर्यातदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. नक्की कोणाच्या चुकीमुळे हे घडले हे तपासण्याची मागणी केली जात आहे.