कोल्हापूर/प्रतिनिधी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने हे विद्यमान खासदार असून हातकणंगलेत उमेदवारी बदलाच्या हालचाली सुरु आहेत. पण हातकणंगलेसाठी धैर्यशील माने हेच उमेदवार असतील अशी माहिती पक्षाच्या नेत्यांकडून मिळत आहे. यातच राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेत सवता सुभा मांडल्याने महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघांमध्ये शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यातील लढत अटळ मानली जात असताना आता महाविकास आघाडीनेही उमेदवारी उभा करण्याचा निर्णय घेतल्याने हातकणंगलेत तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे माविआचा उमेदवार कुणाच्या पथ्यावर पडणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच समजेल.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात थेट लढत होईल असा अंदाज होता. पण राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो’ ची भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीने उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यासंदर्भात महाविकास आघाडीची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत हातकणंगलेत शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार देण्यावर चर्चा झाली. जर महाविकास आघाडीने उमेदवार दिल्यास या आखाड्यामध्ये तुल्यबळ तिरंगी लढत होणार आहे. तसे झाल्यास नेमका कोणाचा राजकीय फायदा होणार यावरून रंजक ठरणारी आकडेमोड, राजकीय समीकरणे मांडण्यास सुरुवात झाली आहे.

राजू शेट्टी यांच्या ‘एकला चलो’च्या भूमिकेमुळे मविआने आपलाच उमेदवार रिंगणात उतरवून ताकदीने लढत देण्याची तयारी चालवली आहे. बुधवारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या निवास्थानी  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांच्यासह मविआच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कोल्हापुरात बैठक झाली. त्यामध्ये हातकणंगले मधून राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्याची तयारी असताना ते ती नाकारत आहेत. त्यांची भूमिका अशी ताठर असेल तर ठाकरे सेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्यापैकी एकाला उमेदवारी देवून खिंड लढण्याचा, निर्णय घेण्यात आला. मविआअंतर्गत जागावाटपात हातकणंगले मतदारसंघ ठाकरे सेनेकडे जाणार आहे. त्यामुळे ठाकरे कोणती भूमिका घेणार याला महत्त्व आले आहे. 

महाविकास आघाडीची मतांची बेरीज आणि विजयाचा विश्वास

राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्यास नकार दिल्याने मविआने हातकणंगलेत मतांची गोळाबेरीज करून  उमेदवार देण्याच्या हालचाली   सुरु केल्या आहेत.  महाविकास आघाडीकडून मतदारसंघात नेत्यांच्या  राजकीय ताकदीची गणितं  करून त्याआधारे विजयाची समीकरणे मांडली जात आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार राजू आवळे, दोन माजी आमदार सुजित मिणचेकर – राजीव आवळे, शिरोळमध्ये माजी आमदार उल्हास पाटील, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, इचलकरंजी मविआची एकत्रित ताकद, शाहूवाडी पन्हाळ्यात आमदारकी घराण्यात राहिलेली तिन्ही घराणी सत्यजित पाटील सरूडकर, गोकुळचे संचालक करण गायकवाड व अमर पाटील, सांगलीतील दोन्ही तालुक्यात असणारा मोठा राजकीय प्रभाव, वाळव्यात जयंत पाटील तर शिराळ्यात आमदार मानसिंग गायकवाड, माजी मंत्री शिवाजीराव नाईक अशी राष्ट्रवादीची मोठी ताकद मिळणार असल्याने या मतदारसंघात मविआचे यशाचे गणितविजयाचे गणित जुळेल असा आत्मविश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रकाश आवडे मानेंना मदत करणार का ?

हातकणंगले लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यावर मतदारांची नाराजी असल्याचे चित्र आहे. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवडे यांनी काही दिवसापूर्वी खासदार माने यांच्या विरोधात भूमिका घेत खासदार बदलण्याचे वक्तव्य केलं होतं. तर धैर्यशील माने यांनी आवडे यांना योग्य वेळी उत्तर देऊ असे प्रत्युत्तर दिले होते.  त्यामुळे आवडे आणि माने यांच्यातील वाद सर्वांसमोर आल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म पळत आमदार आवडे खासदार माने यांना मदत करणार का? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.  

ठाकरेंचा फैसला यशापयशाची गणिते ठरविणार

मविआच्या या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी सूचक प्रतिक्रिया देत, हातकणंगले मतदारसंघ ठाकरे सेनेकडे आहे. ते येथे उमेदवार देणार असतील तर सरळ सरळ हा भाजपला मदत करण्याचा प्रकार आहे. मी कोणत्याही आघाडी सोबत जाणार नाही, पण आघाडीने पाठिंबा दिला तर राज्यात त्यांना कोठे पाठिंबा द्यायचा याचा स्वाभिमानी विचार करेल, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली आहे. काही चुकीच्या निर्णयामुळे आपण मविआमधून बाहेर पडलो आहे. मी माझी भूमिका ठाकरे यांना समजावून सांगितली आहे. आता निर्णय त्यांनी घ्यावा, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे. यावर आता शेट्टींना बाहेरून पाठिंबा द्यायचा की कोणाच्या हातात मशाल देऊन रिंगणात उतरवायचे याचा फैसला ठाकरे यांच्याकडून अपेक्षित आहे. त्यावरच हातकणंगले मतदारसंघातील यशापयशाची गणिते साकारली जाणार आहेत.