कोल्हापूर : पर्यावरणशास्त्र अधिविभागातर्फे शिवाजी विद्यापीठात पर्यावरणपूरक ‘बीज’ गणेशमूर्ती बनविण्याबाबत झालेल्या विशेष कार्यशाळेत शालेय विद्यार्थ्यांसह ७५ जण त्यात सहभागी झाले.

पर्यावरणशास्त्र अधिविभागातर्फे गणेशोत्सव काळात ध्वनी, जल व वायू प्रदूषणाबाबत जनजागृतीबरोबरच मूर्तीदान, विसर्जनासाठी कृत्रिम तलावनिर्मिती, निर्माल्यकुंड, स्वच्छता, प्रदूषण पातळीची मोजणी असे उपक्रम राबविण्यात येतात. यंदाही ‘बीज’ गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत विविध अधिविभागांतील ५० विद्यार्थ्यांसह २५ शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. टेराकोटा मूर्तीकार गौरव काईंगडे यांनी या कार्यशाळेत सहभागींना मार्गदर्शन केले.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या किंवा रासायनिक रंगांच्या मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणात निसर्गाचे प्रदूषण होते. ते टाळण्यासाठी शाडूच्या मूर्ती स्वतःच्या हातांनी बनवायच्या. ही शाडूची गणेश मूर्ती वाळल्यानंतर त्यात विविध फुलझाडांच्या बिया खोवल्या जातात. विसर्जनावेळी तिचे घरीच एखाद्या कुंडीमध्ये विसर्जन करून त्यावर पाणी घातले की, पुन्हा या मूर्तीची माती बनते आणि त्यात खोवलेल्या बिया कुंडीत रुजतात. त्यांचे रुपांतर आकर्षक फुलझाडात होते. या संकल्पनेतून निसर्गाच्या घटकांपासून तयार केलेली गणेशमूर्ती पुन्हा निसर्गात कोणत्याही हानीविना विसर्जित करणे आणि ती परत करताना त्यातून पुन्हा निसर्ग फुलविणे, हे या कृतीतून साध्य होते.

या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार यांच्या हस्ते झाले. त्यांनीही या मूर्ती निर्मितीचा आनंद घेतला. अधिविभागाच्या प्रमुख डॉ. आसावरी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पल्लवी भोसले यांनी या कार्यशाळेचे संयोजन केले. अनिरुद्ध व प्रांजली या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.