मुंबई : आता राज्यात मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १ ऑगस्टपासून राज्यभर सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

मतदारांची ओळख पटवून देण्यासाठी आणि मतदार यादीतील नोंदी प्रमाणित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केल्यास एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त वेळा नोंदणी केल्यास ते शोधून काढणे सोपे होणार आहे. भारत निवडणूक आयोग १ ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याची मोहीम सुरू करणार आहे.

इलेक्ट्रॉनिक इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड डेटाशी आधार डेटा लिंक केल्याने मतदारांचा खासगी आणि वैयक्तिक डेटा वैधानिक प्राधिकरणाला उपलब्ध होईल आणि मतदारांवर मर्यादा लागू होईल. मतदारांना आता त्यांचे संबंधित आधार तपशील सादर करून निवडणूक नोंदणी अधिकारी (प्रतिसाद क्रमांक २) यांच्यासमोर त्यांची ओळख प्रस्थापित करावी लागेल.

मतदारयादीत दुबार नावे असणे, पत्ता अपूर्ण असे अनेक दोष मतदार यादीमध्ये आढळून येतात. या पार्श्वभूमीवर आता मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. एकाच व्यक्तीचे एकापेक्षा अधिक मतदारसंघात किंवा त्याच मतदारसंघात एकापेक्षा अधिक वेळा नावाची नोंदणी आहे का, हे तपासण्यासाठी आधार क्रमांकाची जोडणी उपयुक्त ठरणार आहे.

श्रीकांत देशपांडे म्हणाले, उद्या सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. राजकीय पक्षांना नवीन बदलांची माहिती देण्यात येणार आहे. कोणताही आधार क्रमांक, पब्लिक डोमेनमध्ये जाणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. आधार क्रमांक डिजिट्सला मास्किंग केले जाणार आहे. सारखे असणारे फोटो शोधण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. आतापर्यंत ४० लाख व्हेरिफिकेशन करण्यात आले आहे. मतदार यादीत २० लाख  बनावट नावे आढळली आहेत. एकदा आधारशी लिंक केल्यानंतर मतदाराचे नाव मतदार यादीत एकाच ठिकाणी असेल. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला फक्त एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे, असे त्यांनी सांगितले.