मुंबई (प्रतिनिधी) : दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. तसेच ठाकरे गट बॅकफूटवर गेले आहेत.

दिशा सालियनचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे मत  डॉक्टरांंने व्यक्त केले होते. तोच धागा पकडून भाजप आ. गोपीचंद पडळकर आणि प्रसाद लाड यांनी या प्रकरणी त्या डॉक्टरांचे  ताबडतोब स्टेटमेंट नोंदवले पाहिजे, अशी मागणी केली आहे. तसेच आता मोठ्या घडामोडी घडतील असे सूचक विधान प्रसाद लाड यांनी  सुशांतसिंह राजपूत प्रकरणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दिशा सालियान प्रकरणी तात्काळ डॉक्टरांचे स्टेटमेंट घेतले पाहिजे. दिशाची हत्या करण्यात आल्याचे एका डॉक्टरांचे मत होते. त्यामुळे त्या डॉक्टराची साक्ष नोंदवून घेतली पाहिजे. तसेच या प्रकरणी योग्य तो खुलासा झाला पाहिजे, असे आ. गोपीचंद पडळकर म्हणाले. दिशा सालियन प्रकरणात ज्यांचा सहभाग आहे त्यांना अटक केली पाहिजे. दिशा सालियनचे मारेकरी महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्यासमोर आले पाहिजेत. जे कोणी आरोपी असतील, ते कुणीही असू देत, त्यांची नावे जाहीर केली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे ही पडळकर म्हणाले.