कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंजिनिअरने आसपासच्या समस्या, गरजा लक्षात घेऊन काम करणे गरजेचे आहे. कोणताही उद्योग व्यवसाय यशस्वी होण्यासाठी त्याला अशा सोशल इंजिनिअरिंगची जोड मिळणे गरजेचे असते. आधुनिक इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळेच चितळे उद्योग समूह आज गरुड झेप घेऊ शकला, असे प्रतिपादन बी. जी. चितळे डेअरीचे संचालक आणि काँफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे (सीआयआयआय) महाराष्ट्र समन्वयक गिरीश चितळे यांनी केले.

सीआयआयआयच्या दक्षिण महाराष्ट्र विभागाच्या इंडस्ट्री अकॅडमी पॅनलच्या वतीने डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित ‘सीईओ कनेक्ट’ उपक्रमामध्ये गिरीश चितळे बोलत होते.

सीआयआयआयचे दक्षिण महाराष्ट्र समन्वयक आणि अलॉय स्टीलचे भागीदार रवी डोल्ली यांनी ‘सीआयआयआय’च्या कार्याची माहिती दिली. शिक्षण क्षेत्राला उद्योग जगताशी भक्कमपणे जोडणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. ही दोन्ही क्षेत्रे एकत्रित आल्यास सर्व आव्हान तोंड देणे शक्य आहे. यासाठी उद्योग जगतातील अनुभवी व तज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानाचे आयोजन केले जाते. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उद्योजक बनावे असा आमचा प्रयत्न असल्याचे डोल्ली यांनी सांगितले.

व्यवसायात नवे प्रयोग करण्याची गरजेची आहे. आज जगप्रसिद्ध असलेली चितळे बाकरवडी ही मूळ गुजरातची; मात्र हा प्रकार महाराष्ट्रात आणून त्यात अनेक बदल केले. यामध्ये आपल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा उपयोग केला. १९९५ पासून ही बाकरवडी आम्ही मशीनद्वारेच बनवत आहोत. चितळे समूहाने २० हजार उद्योजक कुटुंबे घडवल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. अभियांत्रिकी म्हणजे उत्तम नोकरी मिळवण्याचा मार्ग हा दृष्टिकोन बदलणे गरजेचे. अनुभव मिळवण्यासाठी काही वर्षे नोकरी जरूर करा पण त्यानंतर व्यवसायाकडे वळा, असे आवाहन त्यांनी केले.

महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट हेड प्रा. सुदर्शन सुतार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, डॉ. ज्योती जाधव यांच्यासह विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज डी.पाटील, विश्वस्त आ. ऋतुराज पाटील, कार्यकारी संचलक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.