कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपूर्वी शिंगणापूर परिसरात दोन बांगलादेशी महिलांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. सदर महिला विना पासपोर्ट, व्हिसा कोल्हापुरात अनेक महिन्यांपासून वास्तव्यास असल्याची निदर्शनास आले आहे. त्याच अनुषंगाने व्हीनस कॉर्नर येथे व्यवसाय करणाऱ्या वारांगनामध्येही काही बांगलादेशी, नेपाळी महिलांचा सहभाग स्पष्ट दिसून येतो. त्यामुळे या महिलांमुळे राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे तात्काळ सदर महिलांना कायदेशीररीत्या ताब्यात घेवून त्यांच्या कागदपत्रांची सखोल तपासणी करावी. यासह सदर महिलांना कोल्हापुरात वेश्या व्यवसायात आणि वास्तव्यास मदत करणारे दोन एजंट सदर बझार येथील असल्याच्या चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये होत आहे. याप्रकरणी कोल्हापूर शहरात खुलेआम सुरु असलेल्या वैश्या व्यवसायावर आणि पाठीशी घालणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली. याबाबत शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांची भेट घेवून मागणीचे निवेदन सादर केले.

यावेळी शिवसेना महिला आघाडी शिष्टमंडळाने अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्याशी चर्चा करताना, शिवसेनेच्या वतीने शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या व्हीनस कॉर्नर रस्त्यावरील वेश्या अड्यावर आंदोलन करून सदर वारांगनाना पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले. वास्तविक पाहता हा प्रमुख मार्ग शहरातून कोकणास जोडणारा, आई अंबाबाई मंदिराकडे जाणारा, कोल्हापूर रेल्वे स्थानक, बस स्थानकाकडे जाणारा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरून फिरताना शहरातील घरंदाज महिलांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे. सदर मार्गावरून घरंदाज महिलांना फिरणे देखील मुश्कील झाले असल्याच्या तक्रारी सदर भागातील महिलांनी केल्या आहेत. दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या करवीरनगरीत आई अंबाबाई मंदिरासह महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. यासह ऐतिहासिक पन्हाळा, विशाळगडासह राधानगरी अभयारण्य सारखी पर्यटन स्थळे लाखो नागरिकांना कोल्हापूरकडे आकर्षित करत आहेत.

कोल्हापुरात लाखोंच्या संख्येने भाविक, पर्यटक भेट देत आहेत. यासह कोल्हापुरात भारतीय सेनेचे कार्यालय अशी महत्त्वाची शासकीय कार्यालये देखील आहेत. असे असताना गेल्या काही महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात राजरोस खून, दरोडे, खुनी हल्ले, मारामारी, गांजा, वेश्या व्यवसाय यासारखे अवैद्य धंदे खुलेआम सुरु असून, यामुळे कोल्हापूर शहराची बदनामी होत आहे. या अवैद्य धंद्यांवर होणाऱ्या जुजबी कारवाई मुळे हे धंदे अधिकच फोफावत चालले आहेत. शहरात अनेक ठिकाणी मसाज पार्लरच्या नावावर अवैद्य व्यवसाय सुरु आहेत. यांचीही तपासणी होणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्ह्याला याची कीड लागली आहे. याप्रकरणी कोल्हापूर शहरात खुलेआम सुरु असलेल्या वैश्या व्यवसायावर आणि पाठीशी घालणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री जाधव यांनी, शिवसेनेच्या आंदोलनाची दखल घेतली असून, पोलीस प्रशासनाकडून या दोन दिवसात कारवाई करण्यात येत आहे. शिष्ठमंडळाने केलेल्या मागणीप्रमाणे सदर महिलांच्या कागदपत्रांची तपासणी करू यामध्ये त्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची ग्वाही दिली.

यावेळी शिवसेना महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, महानगरसमन्वयक पूजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, शिव उद्योग सहकार सेना शहरप्रमुख मंगलताई कुलकर्णी, युवती सेना शहरप्रमुख नम्रता भोसले, पूजा कामते, सुनिता भोपळे, प्रीती अतिग्रे, राधिका पारखे, सना शेख, पूजा आरदांडे आदी महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होत्या.