कळे (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील परखंदळे येथे कुंभी नदीवर पोहायला गेलेल्या प्रसाद गणपती देसाई (वय १६) या शालेय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवार) सकाळी साडे सातच्या सुमारास गोठे- परखंदळे पुला दरम्यान घडली.

दहावी इयत्तेत शिक्षण घेत असलेला प्रसाद देसाई हा गेल्या काही दिवसांपासून गोठे पुलाजवळ पोहायला जात होता. त्याला योग्यरित्या पोहताही येत नसल्याचे समजते. आज सकाळी मित्रांसोबत तो नेहमीप्रमाणे पोहायला गेला. पाण्यात उतरल्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. मात्र पोहायला आलेली इतर मुलांच्या पासून तो काही अंतरावर असल्याने त्यांना त्याला वाचवता आले नाही. अखेर सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी सव्वानऊच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. घटनास्थळी कळे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरला पाठवला आहे.