कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि उपनगरातील रस्त्यांची दुरुस्ती व नालेसफाई करा, पाणी पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करा, रंकाळा प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी करावी अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासह अधिकाऱ्यांना दिल्या.

एसएससी बोर्ड ते शेंडा पार्क मार्गावरील फटीमुळे आणि खड्ड्यांमुळे अपघात होऊन संपूर्ण कुटुंब जखमी झाले आहे. असे अपघाताचे प्रकार घडू नयेत, यासाठी शहर आणि उपनगरांतील खराब रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, या मागणीच निवेदन आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रशासक के . मंजूलक्ष्मी यांना यावेळी दिले. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन शहर आणि उपनगरातील सर्व समस्याचे निराकरण करण्याची ग्वाही प्रशासक के. मंजुलक्ष्मी यानी यावेळी दिली.

कोल्हापूर शहर आणि उपनगर भागातील विविध मूलभूत समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के . मंजूलक्ष्मी,अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व अन्य अधिकाऱ्यासोबत ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात बैठक घेतली.

कोल्हापूर शहरासह उपनगरातील अनेक रस्त्यावर कॉंक्रिटीकरण आणि डांबरीकरण यात फटी निर्माण झाल्या असून त्या वाहतुकीसाठी धोकादायक बनल्या आहेत. त्याबद्दल शहर वासियात तीव्र नाराजी आहे. त्यावर उपाययोजना करून त्वरित त्या फटी मुजवाव्यात, अशी आग्रही मागणी केली.

टेंबलाईवाडी येथील महानगरपालिकेच्या 12 हजार चौरस फूट जागेमध्ये क्रीडांगण विकसित करावे, रंकाळा प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी करावी अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी केल्या. याबाबतचा प्रस्ताव शासनाकड पाठवला जाईल, असे यावेळी प्रशासक के . मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.

शहरातील दुधाळी परिसरातील जिव्हाळा कॉलनी परिसरातील अतिक्रमण काढून रस्ता मोठा करावा. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामे पूर्ण करावी, पूरपरिस्थितीबाबत उपाययोजना कराव्या, सर्व 81 प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची काम पूर्ण करण्यासाठी निधीची उपलब्ध करावी,काही तांत्रिक अडचणीमुळे थेट पाईप लाईन योजना वितरण व्यवस्था सुरळीत करावी, पिण्याच्या पाण्याची कनेक्शनचा दर सर्वसामान्यांना परवडणारा नाही, त्यामुळे त्यात कपात करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

कसबा बावडा येथील झूम प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत . शहरातील कचऱ्याचा उठाव वेळेवर होत नाही. यावर कायमस्वरूपी उपाय शोधणे गरजेचे आहे ,असे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, दुर्वास कदम, मधुकर रामाणे, दिग्विजय मगदूम, सुयोग मगदूम आणि प्रवीण केसरकर यांनीही शहरातील समस्या मांडल्या.