पुणे (प्रतिनिधी) : राज्यातील विधान परिषद निवडणुकीत नागपूरमधून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे , तर अकोल्यातून वसंत खंडेलवाल यांनी  विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला खुले आव्हान दिले आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसने तर निवडणुकीचा पोरखेळ केला होता. आम्ही बिनविरोध करा म्हणत होतो. त्यांनी नागपूरमध्येही बाहेरून आणलेला माणूस त्यालाही फसवलं आहे. आता महाविकास आघाडीला माझं खुलं चॅलेंज आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन दाखवा. कायद्यात बदल करून रडीचा डाव खेळू नका, असे त्यांनी म्हटले आहे.

निवडणुका बिनविरोध करू, असा शब्द काँग्रेसने न पाळल्यामुळे झालेल्या निवडणुकात भाजपला मोठं यश मिळाले आहे. तीन टर्म आमदार असलेल्या बाजोरियाना हरवून खंडेलवाल मोठ्या फरकाने विजयी झाले. बावनकुळेंच्या बाबतीत साई बाबांचं वाक्य खरं ठरलं. श्रद्धा आणि सबुरीचं फळ मिळालं आहे, असेही ते  म्हणाले.