कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील कोरोना रुग्णांची वाढ थांबवण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, असे आवाहन आ. चंद्रकांत जाधव यांनी केले. ते आज (शुक्रवार) कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग, लसीकरण व वैद्यकीय बिल यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आ. ऋतुराज पाटील, महापालिकेचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.

आ. चंद्रकांत जाधव म्हणाले की, कोल्हापूर शहर सुरू होत आहे. सरसकट दुकाने उघडण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे, यामुळे शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची दक्षता प्रशासन व नागरिकांनी घेतली पाहिजे. जे कोरोना रुग्ण घरी अलगीकरण आहेत, अशा रुग्णांवर विशेष लक्ष ठेवले पाहिजे. प्रशासनाने घरी अलगीकरण असलेल्या रुग्णांच्या वर विशेष लक्ष ठेवावे. प्रशासनाने निर्बंध कडक करावेत, होम क्वॉरंटाइन बंद करावे, बाधितांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणावर करा, कंटेनेमेंट झोन्समध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन होत आहे, याची दक्षता घ्या, आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा ; मात्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणा अशा सूचना केल्या.

लसीकरण केंद्रावर गोंधळ होऊ नये यासाठी योग्य नियोजन केले पाहिजे. लसीकरणामध्ये प्राधान्याने दुसरा डोस दिला जात आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर रांगा लागल्या नाही पाहिजेत. ज्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे, अशा नागरिकांना महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने फोन करावेत. ज्यांना फोन झालेत, त्यांना वेळेचे स्लॉट द्या व त्याच वेळेत त्यांनी केंद्रावर येऊन लस घ्यावी. महापालिकेने नेमलेल्या ऑडिटरनी वैद्यकीय बिलांचे तंतोतंत ऑडिट करून, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा द्यावा, असेही ते म्हणाले.

कोरोना लसीकरण केंद्रावरील गोंधळ टाळण्यासाठी महानगरपालिकेने सोशल मिडीया, रेडिओ व वृत्तपत्रातून नागरिकांना आवाहन करावे अशी सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी केली.

उपायुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त निखिल मोरे, शहर अभियंता नेत्रदीपक सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, एन. एस. पाटील, हर्षजीत घाटगे, बाबूराव दबडे, डॉ. अमोलकुमार माने आदी उपस्थित होते.