नाशिक (प्रतिनिधी) : शनिवारी काढलेला महामोर्चा हा महाविकास आघाडीचा होता; मात्र महाविकास आघाडीमध्ये आम्हाला घ्यायला मतभेद आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यास विरोध आहे, असे वक्तव्य करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ‘मविआ’च्या महामोर्चात सामील न होण्याचे कारण सांगितले. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गरिबाला सत्तेत येऊच द्यायचे नाही. हा मोर्चा शिवसेनेचा आहे, नावाला फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे’, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी कॉँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीच्या महामोर्चामध्ये सामील न होण्यामागचे कारण सांगितले. ‘हा मोर्चा महाविकास आघाडीचा असून, आम्हाला घ्यायला मतभेद आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला घ्यायला विरोध आहे. त्यामुळे आमच्या जाण्याचा संबंध येत नाही. आम्हाला सोबत घेण्याबाबत उध्दव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गरिबाला सत्तेत येऊच द्यायचे नाही. हा मोर्चा शिवसेनेचा असून, नावाला फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे’, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

‘आम्ही वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घायचा विचार करू, असे उद्धव ठाकरे यांनी केवळ आम्हाला सांगितले होते. मात्र, अजित पवार यांनी हा प्रश्न अजून विचाराधीन असल्याचे सांगितले. त्यामुळे याचा अर्थ नाही असा होतो. राष्ट्रवादी हा श्रीमंत मराठ्यांचा पक्ष आहे. त्यांना गरीब मराठा देखील चालत नाही. मी एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलो नाही. ते राजगृहावर भेटायला आले. एक कुटुंब म्हणून आम्ही स्वागत केले. इंदू मिल संदर्भात विषयांवर चर्चा झाली. सध्या राज्यात गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.