मुंबई (प्रतिनिधी) :  जगभरात कोरोना वाढत आहे. चीनसह अमेरिका, दक्षिण कोरिया आणि इतर अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट झाले असून, केंद्राकडून राज्यांना कोरोनासंदर्भातील उपाययोजनेबाबत एक पत्र देखील पाठवण्यात आले आहेत. दुसरीकडे रेल्वे प्रशासन देखील सतर्क झाले असून, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नाताळची सुटी व नूतन वर्षाच्या प्रारंभामुळे रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी आहे. वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे रेल्वे प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. प्रवासात तोंडाला मास्क लावावा, सुरक्षित अंतर ठेवावे, प्रवासात सॅनिटायजरचा वापर करावा अशा सूचना रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना देण्यात आल्या आहेत. नवीन वर्षाच्या प्रारंभामुळे आणि नाताळमुळे पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने प्रवाशांच्या प्रतिक्षा यादीत मोठी वाढ झाली आहे तसेच रेल्वे प्रवाशांनी सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.