कोल्हापूर (प्रतिनिधी) : गंगावेश ते शिवाजी पूल आखरी रास्ता कामातील तांत्रिक अडचणी दूर करून त्वरीत रस्ता पूर्ण करावा. तर या कामाची जबाबदारी  पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेऊन आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन त्वरीत मार्ग काढावा. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी दयावा, अशी मागणी आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात म्हटलं आहे की, गंगावेश ते शिवाजी पूल या रस्त्यासाठी कृती समिती च्या वतीने गेली पाच वर्षे जन आंदोलन सुरू आहे. शहराला जोडणाऱ्या हा प्रमुख मार्ग  कोकण, जोतिबा, पन्हाळा व कोल्हापूर स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सोयीचा आहे.

दरम्यान, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून आखरी रास्ता तरुण मंडळ ते गायकवाड वाडा या मार्गाचे काम झाले आहे. कै. आ. चंद्रकांत जाधव यांच्या पुढाकाराने शुक्रवार गेट ते पंचगंगा तालीम मार्गाचे काम अर्धवट झाले आहे. ठेकेदाराने साधनसामग्री, साहित्य व मजूर हटवले आहेत. या कामात काही तांत्रिक अडचणी असल्याच्या प्रशासनाकडून सांगण्यात  येत आहेत.

तरी या कामात पालकमंत्री पाटील यांनी लक्ष घालून काम मार्गी लावून कै. आ. चंद्रकांत जाधव यांचे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या पत्रकात कृती समितीचे समन्वयक किशोर घाटगे, राकेश पाटील, सुरेश कदम, रियाज बागवान, सनी अतिग्रे, अनंत पाटील यांच्या सह्या आहेत.