देवगड (प्रतिनिधी) : शहराच्या प्रारुप विकास आराखड्यासंदर्भात जनतेला माहिती देण्यासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीने शुक्रवारी दुपारी इंद्रप्रस्थ हॉल येथे आयोजित केलेल्या विशेष सभेत ग्रामस्थांनी प्रारुप विकास आराखड्याला पुन्हा विरोध दर्शवून तो रद्द करण्याची एकमुखी मागणी केली. यावेळी नगररचना अधिकारी नाजनीन मोमीन, प्रभारी मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी ग्रामस्थांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्याचा तसेच आराखडा समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अखेर, ग्रामस्थांनी प्रारुप विकास आराखड्यावर हरकती नोंदविण्यासाठी एक महिन्याच्या वाढीव कालावधीची मागणी केली. यावर, आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या सोमवारपर्यंत वाढीव कालावधीबाबतचा निर्णय दिला जाईल. तसेच जनतेला आराखडा समजून सांगण्यासाठी न. पं. कार्यालयात नगररचना विभागाकडून एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आश्वासन श्रीमती मोमीन यांनी सभेत दिले.

व्यासपीठावर नगररचना सहाय्यक जीवन सरडे उपस्थित होते. या सभेच्या सुरुवातीला नगररचना अधिकारी श्रीमती मोमीन यांनी ग्रामस्थांना शहराच्या प्रारुप विकास आराखड्याबाबत माहिती दिली. हा आराखडा अंतिम नसून ही पहिली पायरी आहे. हा आराखडा अद्याप मंजूर झालेला नाही. या आराखड्यावर ग्रामस्थांनी हरकती, सूचना नगर पंचायत कार्यालयात नोंदवायच्या आहेत. या हरकतींवर तज्ज्ञ समितीच्यावतीने सुनावणी घेण्यात येईल. या समितीच्या अहवालानंतर या आराखड्यात आवश्यक फेरबदल करण्यात येतील व नवीन आराखडा पुन्हा जनतेसमोर ठेवण्यात येईल, असे श्रीमती मोमीन यांनी सांगितले.

प्रसाद मोंडकर म्हणाले, हा आराखडा सदोष असून हा आराखड्याचे फायदे व तोटे काय आहेत? आरक्षित जमीन जागांसाठी निकष कोणते आहेत? हे जनतेला समजून सांगावे, अशी मागणी केली. तर संजय बांदेकर यांनी आराखड्यासाठी कधी सर्व्हे करण्यात आला होता, अशी विचारणा केली. श्रीमती मोमीन म्हणाल्या, आराखड्याला केवळ विरोध करून उपयोग नाही. जनतेने हा आराखडा समजून घ्यावा. हा आराखडा आज रद्द झाला, तर तो पुढील काळात होणारच आहे. पुढील २० वर्षांचा विचार करून हा आराखडा बनविण्यात आला असून वाढत्या शहरीकरणात आपल्या शहराचे सौंदर्गीकरण टिकवून ठेवण्यासाठी हा आराखडा महत्वाचा आहे. आतापर्यंत न. पं. कार्यालयात ३५ हरकती प्राप्त झाल्या असून येथे उपस्थित जनसमुदाय लक्षात घेता हरकतींची संख्या वाढली पाहिजे. हरकतींवर योग्य निर्णय तज्ज्ञ समितीमार्फत घेतले जातील. जमीन जागांवरील आरक्षणे म्हणजे शासनाचा मालकी हक्क नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आराखडा नीट समजून घ्यावा व आपल्या हरकती नोंद कराव्यात, असे आवाहन केले.

हा आराखडा जनतेला विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आला आहे. या आराखड्याबाबत जनजागृती करण्यात न. पं. प्रशासन फेल ठरले आहे. त्यामुळे हा आराखडा रद्द करावा, अशी मागणी शिवाजी कांदळगावकर यांनी केली. तर आनंदवाडी गावामध्ये टाकण्यात आलेल्या आरक्षणात मंदिर, वस्त्यांचाही समावेश आहे. तेथील मच्छीमारांनी उदरनिर्वाह करायचा कसा? जगायचे कसे? घेतलेल्या हरकती तज्ज्ञ समितीमार्फत फेटाळण्यात आल्या, तर पुढे आम्ही काय करायचे? असा सवाल संजय बांदेकर यांनी उपस्थित केला.

विजय कदम म्हणाले, हा आराखडा सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. सरकारी जमिनीचा समावेश आरक्षणात नाही. शासनाच्या अनेक जमिनी पड स्वरुपात आहेत. त्यामुळे हा आराखडा रद्द करून नव्याने आराखडा तयार करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

रिमा आचरेकर यांनी सभेत भूमी अभिलेखचे अधिकारी उपस्थित नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. भूमी अभिलेखच्या कार्यालयात आम्हाला वेळेत नकाशा मिळत नाहीत. पण आराखड्यासाठी नकाशा उपलब्ध होतात. हा सगळा अनागोंदी कारभार असून हा आराखडा रद्द झाला पाहिजे, असे सांगून त्यांनी टीएफसी झोनबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या शंकाचे निरसन मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले.

यावेळी विलास रुमडे म्हणाले, जनतेला हा आराखडा वेळेत न मिळाल्याने व त्याची जनजागृती झालेली नाही. त्यामुळे हा आराखडा समजून घेऊन त्यावर हरकती नोंदविण्यासाठी वाढीव ३० दिवसांची मुदत मिळावी, अशी मागणी केली. अॅड. अजित गोगटे म्हणाले, आराखड्याबाबत जनतेमध्ये नाराजी आहे. तरीही आपले शहर सुंदर बनविण्यासाठी व शहराचा विकास साध्य करण्यासाठी विकास आराखडा महत्वाचा आहे. त्यामुळे जनतेने जास्तीत जास्त हरकती नोंदवून हा विकास आराखडा अधिक चांगला होण्यासाठी प्रयत्न करावेत. हीच खरी जनशक्तीची ताकद आहे, असे सांगितले.

यावेळी ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, नगरसेवक नगरसेविका, डॉ. सुनील आठवले, उमेश कुळकर्णी, चंदन मेस्त्री, निशिकांत साटम आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत राजा भुजबळ, योगेश चांदोस्कर, चारुदत्त सोमण, दत्ताराम जुवाटकर, प्रदीप कोयंडे, शरद लाड आदींनी सहभाग घेतला. या सभेला सुमारे ५०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.