मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाहीये. तज्ज्ञांनी आपल्याला तिसरी लाट येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घाई-गडबडीने घेऊ नका, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते आज (गुरुवार) सर्वाधिक कोरोना संसर्ग असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या ७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, दुसऱ्या लाटेतून आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ठरवल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. पातळ्यांच्या आधारे नागरिक मुक्तपणे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील तर त्यामुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते. यादृष्टीने आपल्या जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने सर्व व्यवहार खुले करू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आत्तापासून करून ठेवावा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधी व इतर आवश्यक वैद्यकीय सामुग्री उपलब्ध राहील याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.