मुंबई  (प्रतिनिधी) : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वादग्रस्त विधानानंतर सारवासारव करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यात बोलताना ते म्हणले ‘संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदीर होते, ते औरंगजेबाने तोडले नाही, तो क्रूर असता तर त्याने विष्णूचे मंदीर तोडले असते ना,’ असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केले. या विधानामुळे वाद होईल हे लक्षात आल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी लगेचच पत्रकारांना बोलावून पुन्हा प्रतिक्रिया देत औरंगजेब क्रूर होता, अशी सारवासारव केली.

परंतु  ही सारवासारव करताना जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक चूक केली. औरंगजेबाचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. औरंगजेबाचा मृत्यू नगर जिल्ह्यातल्या भिंगारमध्ये झाला होता, पण औरंगजेबाच्या इच्छेनुसार औरंगाबादमध्ये त्याचा दफनविधी करण्यात आला होता. दरम्यान औरंगजेबाच्या मृत्यूबाबत आपण चुकीची माहिती दिल्याचे ही  जितेंद्र आव्हाड यांनी मान्य केले आहे.

वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलले, ज्यात ते औरंगजेब क्रूर होता, असे म्हणत आहेत. ‘औरंगजेब  किती क्रूर होता हे इतिहासात लिहून ठेवले आहे. त्याने भावाला, वडिलांना मारले आणि गादीवर बसला. औरंगजेब क्रूरच होता. स्वत:च्या राज्य रचनेकरता औरंगजेब कोणालाही सोडत नव्हता, पण त्याला महाराष्ट्र कधीही जिंकता आला नाही,’ असे स्पष्टीकरण यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिले.