कोल्हापूर (प्रतिनिधी) :  राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १५ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

ना. मुश्रीफ म्हणाले की, राज्यात २०२४ अखेर ४० हजार किमीच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यापैकी २०२१-२२ आणि २०२२-२३ या कालावधीसाठी १० हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट नसलेल्या आणि दूरावस्था झालेल्या रस्त्यांचा विचार मुख्यत्वाने या टप्प्यात केला जाणार आहे. कोअर नेटवर्कमध्ये समाविष्ट असलेल्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाच्या लांबीचा दर्जोन्नतीसाठी विचार करण्यात येणार आहे. तर या रस्त्यांच्या दर्जोन्नतीचे काम पूर्ण करण्यासाठी पुढील २ वर्षांचे उद्धिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहितीदेखील ना. मुश्रीफ यांनी दिली.

योजनेसाठीच्या रस्त्यांचा प्राधान्यक्रम ठरवताना त्या मार्गावरून होणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसच्या फेऱ्यांचाही निकष लावणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी दिली. रस्त्यांची निवड ही मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-१ प्रमाणे जिल्हा स्तरावर गठित करण्यात आलेल्या पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत करण्यात येणार आहे. शिवाय, योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी लावण्यात आलेले सर्वच्या सर्व निकष हे दुसऱ्या टप्प्यालाही लागू असणार असे ना. मुश्रीफ म्हणाले.