राशिवडे (प्रतिनिधी) : राशिवडे येथील दिलीप आनंद शिंदे यांच्या घरी शुक्रवारी सायंकाळी ६ ते ८ वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी चोरी केली. यावेळी नेकलेस, चिताक,  हातातील कडे,  रिंगा असे मिळून साडेसात तोळे सोने आणि रोख रक्कम १० हजारांवर चोरट्यांनी डल्ला मारला. भर सायंकाळच्या वेळी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

दिलीप शिंदे बाजारपेठेत वडापावचा गाडा चालवतात. शुक्रवार बाजार असल्यामुळे घरातील सर्वच व्यक्ती दुकानात गेल्याची चोरट्यांनी संधी साधली. चोरी करताना कोणत्याही प्रकारची तोडफोड न करता किल्ली ठेवलेल्या जागेवरून किल्ली घेऊन कुलूप काढून चोरी करण्यात आली. पुन्हा किल्ली आहे. त्याच ठिकाणी ठेवण्यात आली. यावरून चोरट्याने पूर्ण माहिती घेऊन चोरी केल्याने चोरटा परिसरातीलच असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, रात्री   उशीरा शिंदे कुटुंबीय घरी आल्यानंतर पसारा विस्कटलेला पाहून चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. पुढील तपास  पोलीस करत आहेत.