मुंबई : राज्यात अरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. आता मराठा आंदोलकांनी आणि ओबीसी नेत्यांनी शरद पवारांनी मध्यस्थी करावी, असा पवित्रा घेतल्यानंतर शरद पवार दोन दिवसांच्या छत्रपती संभाजीनागर दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी पवारांची भेट घेतली. यावर पवार यांनी दोघांमध्ये सामंजस्य कसं करता येईल यावर अधिक लक्ष देणं गरजेचं असल्याचे ते म्हणालेत. यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आरक्षणाला धक्का लागल्यास राजकारण सोडेन, असं वक्तव्य केलं आहे.

काल (शुक्रवारी दि.२६) स्थानिक वात्सल्य सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना पटेल म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी महायुती सरकार संविधान बदलणार असल्याचा प्रचार प्रसार केला. लोकांची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी केले. आपण अपप्रचाराला बळी पडले. देशाचे संविधान संपविण्याची कुणाचीही ताकद नाही. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. आरक्षणाला धक्का लागणार नाही. अन्यथा राजकारण सोडेन, अशी ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

खा. पटेल म्हणाले, गोंदिया-भंडारा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भात पाठपुरावा करू. केंद्र व राज्य सरकारने जनता जनार्दनाच्या हितासाठी अनेक योजना आणल्या. मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली. शेतीमालाला बोनस देण्याची प्रथा २००९-१० मध्ये प्रफुल्ल पटेलांनी आणली.

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्माननिधी मिळतो. आता मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ९३ हजार महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. आम्ही हे केले. ते केले हे आम्हालाच सांगावे लागते ही बाब चुकीची आहे. या कामांना विसरून चालता येणार नाही. विचारसरणी बदला. भरभरून केलेल्या कामांची जाणीव ठेवा. हिमतीने लोकांपर्यंत जाऊन विकासकामे सांगा, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.