मुंबई (प्रतिनिधी) : मंत्रीमंडळ विस्तार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील राजभवनात रविवारी संपन्न झाला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातील नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले आहे. त्यामुळे छगन भुजबळानी आपली नारीज जाहिररीत्या व्यक्त केलेली पहायला मिळत आहे. छगन भुजबळ म्हणाले, जरांगेंना अंगावर घेतल्याचं चांगलचं बक्षीस मिळालं. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आ. संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले..?

राऊत म्हणाले की, महायुतीकडे 225 च्या जवळपास आकडा असल्याने त्यांच्याकडे मोठे बहुमत आहे. त्यामुळे कोणाचा असंतोष बाहेर आला तरी सरकारला चटके बसतील अशी शक्यता नाही. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. मधल्या काळात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भुजबळ यांनी टोकाची भूमिका घेतली. आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की त्यांनी थोडा संयम पाळायला हवा होता. कारण दोन्ही समाज महाराष्ट्रातील प्रमुख सामाजिक घटक आहेत. सगळ्यांना न्याय मिळावा ही आमच्या सगळ्यांची भूमिका असताना भुजबळ यांनी एक टोकाची भूमिका घेतली. पण ती भूमिका त्यांना घ्यायला लावली. भुजबळांचा पुरेपूर वापर त्या काळात झाला. जरांगे यांच्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा वापर झाला असे स्पष्ट दिसत होते. नाहीतर इतकी टोकाची भूमिका भुजबळ घेऊ शकत नव्हते. ज्यांनी त्यांना टोकाची भूमिका घ्यायला लावली, त्यांनी भुजबळांना वाऱ्यावर सोडले हे माझे आकलन असल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत.

राऊत पुढे म्हणाले, भुजबळांनी आता कितीही आदळआपट केला तरी त्यांची लढण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता किती आहे? हे पाहावे लागेल. महाराष्ट्रात जातीय सलोखा, समन्वय राहावा ही आमची भूमिका आजही आहे. बाकी आता इतर काही लोक अश्रू ढाळत आहेत त्यांच्या अश्रूंना कोण विचारत आहे..? त्यांच्या अश्रूंना काय किंमत आहे..? रडतील आणि गप्प बसतील. कारण एखादा-दुसरा आमदार नाराज झाला म्हणून या सरकारला तडा जाईल, अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे हे काही दिवस रडतील, त्यांना हातात एखादं खेळणं दिले जाईल आणि सगळे शांत राहतील, असं वक्तव्यही महायुतीच्या नाराज आमदारांनवर संजय राऊत यांनी केलंं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे नग आणि नमुने आहेत, त्या संदर्भात फडणवीसांनी स्वतः अभ्यास करावा. काही वर्षांपूर्वी याच नमुन्यांविषयी आपण काय भूमिका घेतली होती..? काय संशोधन केले होते..? किती प्रकारचे भ्रष्टाचाराचे पेपर्स आपण राज्यपालांकडे सोपवले होते..? हे सगळे नग आणि नमुने घेऊन फडणवीस राज्य करत आहेत. ते आता आदर्श कारभार करणार आहेत, असे मी वाचले आणि आमचे मनोरंजन झाले. पुढील पाच वर्षात असे मनोरंजनाचे अनेक प्रसंग आम्हाला पाहायला मिळतील, अशी खरमरीत टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

छगन भुजबळ यांची नाराजी कायम असल्याने ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडण्याचे संकेत देखील भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधताना दिले आहेत. जहाँ नही चेंना वहाँ नही …अशा शायराना अंदाजात भुजबळांनी आपले संकेत दिले असल्याचं पहायला मिळत आहेत. आता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून छगन भुजबळ हाती मशाल घेतात की, तुतारी फुंकतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.