मुंबई : मला आणि आदित्यला जेलमध्ये टाकण्याचे षडयंत्र फडणवीसांनी रचले होते. आपण शांत बसलो, पण आता शांत बसणार नाही. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दंड थोपटलेत. त्यामुळे ठाकरे यांच्या आव्हानाला फडणवीस काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टिका केली. घरं फोडली, पक्ष फोडले पण त्यातूनही त्यांच्या हाती काहीच लागले नाही. हिंदुत्व सोडलं असा संभ्रम निर्माण केला जात आहे. तोडाफोडा आणि राज्यकरा ही मोदी शहांची निती आहे. न खाऊंगा न खाने दूंगा असे म्हणणारे खा खा खातात असा आरोपही त्यांनी यावेळी केला. पंचवीस वर्षे युतीत होतो पण त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. भाजपम्हणजे चोर मंडळी आहेत. मोदींची भाषण म्हणजे रोमांच वाटायची. पण आता त्यांची किव येते. आपल्या आयुष्यातील परीक्षा घेणार हे शेवटचं आव्हान आहे. ते यशस्वी पणे आपल्याला पेलाचे आहे. मला आणि आदित्यला जेलमध्ये टाकण्याचा डाव फडणवीसांचा होता. पण त्यांना आताच सांगतो या राजकारणात एक तर ते राहातील नाहीतर मी राहीन असे थेट आव्हानच त्यांनी फडणवीसांना दिलं आहे.

तसेच गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे नेते आपल्याला भेटून गेले आहेत. अनेकजण म्हणाले की, उद्धवजी आपने देश को दिशा दिखाई है. मी म्हणालो, जोपर्यंत आपण सरळ होतो, तोपर्यंत सरळ असतो. पण एकदा वाकड्यात घुसलो की आपण वाकडं करतो. भाजप म्हणजे चोर कंपनी आहे, ही राजकारणातील षंढ माणसं आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
लोकसभा निवडणुकीत आपण असे लढलो की, मोदींनाही घाम फुटला. मोदींची भाषण ऐकताना आता कीव येते. मी कधी नगरसेवक झालो नव्हतो, थेट मुख्यमंत्री झालो. जे जे शक्य होतं, ते सगळं मी केले. हे आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे.

त्यानंतर आपल्याला आव्हान देणार कोणी राहणार नाही. यांनी आपला पक्ष आणि कुटुंब फोडला. आता हे आपल्याला आव्हान द्यायला उभे आहेत. शिवसेना ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे. मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता. आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्याला असे वागवले जात आहे. हे सगळं दोन व्यापारी करत आहेत. त्यांची वृत्ती आपल्याला मुळासकट उपटून टाकायची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

एकनाथ शिंदेंवरही हल्लाबोल
यावेळी बोलताना ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला. अनेक चोर लोक ग्रामिण भागात बाळासाहेबांचा फोटो वापरत आहेत. बाळासाहेबांचा धनुष्यबाण असाही प्रचार करत आहेत. त्यांच्या प्रचाराला भूलू नका. सध्या गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे मशाल घराघरापर्यंत पोहोचवा. मशाल हे आपलं चिन्ह आहे. आपल्या बरोबर अनेक जाती धर्माचे लोक मोठ्या ताकदीने येत आहेत. लोकांच्या मनात सध्याच्या सरकार आणि पक्ष फोडी बाबत प्रचंड राग आहे. त्यामुळे आगामी काळात आपली सत्ता येणार, ती आणणारच असे ठाकरे म्हणाले.