कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या अर्थसंकल्पात प्रामुख्याने रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, एमएसएमई आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रीत केले आहे. शेतीसुधारणा, नैसर्गीक शेतीला चालना, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना संधी, रोजगारांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे तसेच पायाभूत सुविधांवर भर देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
ना. मुश्रीफ यांनी, सर्व सामान्यांसाठी असणाऱ्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला पाच वर्षांची मुदतवाढ दिली आहे. वर्षाला तीन घरगुती वापराचे सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय हा अतिशय चांगला असून सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. मुद्रा लोनची मर्यादा १० लाखांहून २० लाख करून तरूणांना उद्योगाकडे वळवून स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच नवीन इंटर्नशिप योजना जाहीर करताना सुमारे १ कोटी तरुणांसाठी आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी आणि या कालावधीत त्यांना दरमहा ५ हजार रुपये दिले जाणार आहेत. कर्करोगाच्या रुग्णांसाठी आवश्यक अशा आणखी तीन औषधांना सीमाशुल्कातून सूट जाहीर करण्यात आली आहे. एकुणच हा अर्थसंकल्प सर्वच स्तरातील नागरिकांचे राहणीमान सुधारणारा असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.