कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’, ही कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरू केलेली मोहीम आता राज्यभर पोहचली आहे. नगरविकास विभागाने या मोहिमेचा शासन निर्णयही काढला आहे.

राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी देसाई यांनी ‘मास्क नाही मग प्रवेश नाही’, ‘मास्क नाही तर वस्तू नाही’, ‘सामाजिक अंतर नाही तर वितरणही नाही’, अशी अभिनव मोहीम सुरू केली. त्यात मास्कचा वापर, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझर यावर भर दिला आहे. ग्राहकाने मास्क घातला नसेल तर दुकानदार त्याला प्रवेश देणार नाही आणि दुकानदारांने घातला नसेल तर ग्राहक वस्तू खरेदी करणार नाही. याचे उल्लंघन झाल्यास ग्राहकांना दंड तसेच आस्थापना सीलबंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या मोहिमेचा गौरव मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करुन राज्यात इतर जिल्ह्यांनीही याचे अनुकरण करण्याचे आदेश दिले होते. त्याचा आता शासन आदेशही निघाला आहे.