मुंबई : सध्या राज्यातील राजकारणात एक मुद्दा फार चर्चेत आहे, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? राष्ट्रवादी काँग्रेस: शरदचंद्र पवार पक्षाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षासोबत जाव, असा एक मतप्रवाह पक्षात असल्याचं खुद्द शरद पवार यांनी सांगितलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं. त्याशिवाय पवार म्हणाले की, केंद्रात विरोधीपक्षात बसायचं की नाही, याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा. दोन्ही राष्ट्रवादी यांनी एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून ठरवावं, असंही ते म्हणाले. तसेच, विचारधारा एकच सल्याने भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही, असंही पवार म्हणाले. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे..?

खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. त्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता, आम्ही एक कुटुंब म्हणून सोबत असतो असे उत्तर सुप्रिया सुळेंनी दिले. राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. आमचे 8 खासदार काय निर्णय घेतील ते पाहूयात. आधी लग्न कोंढाण्याचं, सध्या राष्ट्र मग नंतर महाराष्ट्राचा निर्णय होईल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. आमचे 8 ही खासदार उत्तम परफॉर्म करणारे आहेत. 8 खासदार एकत्रित आहेत, जो निर्णय घेतला जाईल तो एकत्रित घेतला जाईल. मला आधी साहेबांना भेटावे लागेल, जेव्हा भेट होईल तेव्हा साहेबांशी चर्चा करेल. साहेब आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. पण सध्या देश पहिला आहे, त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी म्हटले.