कळे (प्रतिनिधी) : सावर्डे तर्फ असंडोली ( ता.पन्हाळा ) येथील जि. प. प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी पर्यत वर्ग असून एकूण विद्यार्थी पटसंख्या 100 आहे. लोक वगर्णीतून उभा केलेली सर्व सोयीनीयुक्त आणि सुसज्ज अशी इमारत आहे. एकूण मंजूर शिक्षक पदे 5 असून कार्यरत 4 आहेत. त्यापैकी अध्यापक 3, विज्ञान विषय शिक्षक एक आहे. तर भाषा विषय शिक्षक पद रिक्त आहे. 

गेली 5 वर्षापासून एक पद रिक्त आहे. प्रभारी मुख्याध्यापकांना शाळेची इतर कामे पाहून मुलांना शिकवावे लागते. तर इतर तीन शिक्षकांवरती अतिरिक्त भार येत असून दोन दोन वर्ग एकत्र करून विद्यार्थ्यांना शिकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शाळेतील भाषा विषय शिक्षक रिक्त पद त्वरित भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी पालकांतून मागणी होत आहे.

प्राथमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पाया मानला जातो. पण शिक्षण विभागाच्या आडमुठी धोरणामुळे हा पाया ढासळण्याची भीती निर्माण झाली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना यांचे सोयरंसुतक नसून या प्रश्नाकडे डोळेझाक केले जात आहे. शासनाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. परंतु शाळेत शिक्षकच नसतील तर या सुविधांचा उपयोग काय ? शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी बदल्या पाहिजेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा ओस पडलेल्या दिसत आहेत.

गेल्या पाच वर्षापासून रिक्त शिक्षकपदासाठी पाठपुरावा सुरू आहे. वारंवार पंचायत समिती व जि.प.अधिकाऱ्यांना शिक्षकाबाबत विचारले असता शिक्षकच नाहीत तर देणार कुठून ? अशी उत्तरे दिली जात आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांकडून नुसतीच पोकळ आश्वासने मिळत आहेत. गेल्या 5 वर्षापासून विद्यार्थ्यांचे शिक्षकाअभावी शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याला जबाबदार कोण ? असा पालकांतून सूर उमटत आहे. याचा परिणाम होऊन पालकवर्ग आपल्या मुलांना इतर शाळेत पाठवत आहेत. त्यामुळे शाळेची पटसंख्या घटत आहे. स्वंय अध्ययनाद्वारे अभ्यास करण्याची वेळ विद्यार्थ्यांच्यावरती आली आहे. शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराबाबत पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. प्राथमिक शाळेस रिक्त शिक्षक पद न भरल्यास पालकांनी व ग्रामस्थांनी शाळेस टाळे ठोकण्याचा निर्णय पालक सभेत घेतला आहे.