कोल्हापूर (प्रतिनिधी) : नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्याची खुणगाठ बांधा. त्यासाठी, कोल्हापूर शहरासह आपापले विधानसभा मतदारसंघ घट्ट करा. लोकांची मनस्थिती तयार करा. मनामध्ये कोणतीही शंका- कुशंका राखू नका, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच या लढाईत सर्वांनीच मोठ्या ताकतीने आणि हिमतीने उतरावे लागेल, असेही ते म्हणाले. ते कोल्हपुरातील मार्केट यार्डमध्ये शिवसेना,-शिंदे गट, राष्ट्रवादी, भाजपासह मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मंत्री मुश्रीफ बोलत होते.
ना. मुश्रीफ म्हणाले, प्रा. संजय मंडलिक यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत होय. विद्यार्थी, नवमतदार, व्यापारी यांच्या मतदानाबद्दल माझ्या मनात शंका नाही. परंतु; बहुजन समाजापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रा. संजय मंडलिक यांना निवडून आणायचे असे आवाहन केले.
खा. संजय मंडलिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झालेले देशातील काम. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून झालेले काम. ही आमच्याकडे सांगण्यासारखी बाजू आहे. हे कामच जनतेपर्यंत पोहोचवा. विरोधी बाजूकडे सांगण्यासारखे कोणतेही काम नाही. त्यामुळे जनता निश्चित मोठ्या मताधिक्याने आपल्याला निवडून देईल, असा विश्वास व्यक्त केला.
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचूया. कामाची पोहोचपावती मोठ्या मताधिक्यातून निश्चितच मिळेल.
आमदार राजेश पाटील म्हणाले, या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ कृष्णाच्या भूमिकेत आहेत. तर खासदार धनंजय महाडिक हे अर्जुनाच्या भूमिकेत आहेत. विजय निश्चित आहे, फक्त मताधिक्याची उत्सुकता लागल्याचे सांगितले.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना खासदारकीच्या दहा निवडणुकांचा अनुभव पाठीशी आहे. तगड्या संघटनाच्या जोरावर ही निवडणूकही जिंकू.
माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, सर्वच मित्रपक्षांनी समन्वयाने काम करूया. द्याल ती जबाबदारी समर्थपणे पार पाडू.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात केलेले अफाट काम घेऊन मतदारांपर्यंत जाऊया. विरोधी बाजूला आरोप प्रत्यारोपाची संधी न देण्यासाठी त्यांच्यावर टीका न करण्याचे धोरण घेऊया. श्री. मोदींचे “चारशे पार” चे उद्दिष्ट या निवडणुकीत निश्चितच यशस्वी होईल, असेही ते म्हणाले.
शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष सुजित चव्हाण म्हणाले, समन्वयाने संघटितपणे विजयी पताका खेचून आणूया आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करूया.
यावेळी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, राहुल चिकोडे, उदयसिंह पाटील-कौलवकर, युवराज पाटील, पी. जी. शिंदे, भैया माने, ॲड. नीता मगदूम, नाथाजी पाटील, सतीश पाटील, कृष्णा चौगुले आदी उपस्थित होते.