कोल्हापूर (प्रतिनिधी) : रब्बी हंगाम 2024 पासून तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर पीकस्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या ५ पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
या पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. पीक स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावर कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.
राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात आणि उत्पादकतेत वाढ करण्यात येते. प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जावून कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होवून राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून ही राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
पात्रता निकष –
स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे आणि ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा इत्यादी कागदपत्रे असावीत.