बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नेमकी कशामुळे झाली, या हत्येमागे कोणाचा हात आहे, गेल्या महिनाभरापासून राज्यातील जनेतला हा प्रश्न पडला आहे. मात्र, या घटनेचा तपास ज्या सीआयडीकडे देण्यात आला आहे, त्या एसआयटीने आज वाल्मिक कराडला कोर्टात हजर केले असता महत्त्वाची माहिती दिली. खंडणी प्रकरण आणि हत्याप्रकरणाची इंटरलिंक असल्याचे सांगत खंडणीप्रकरणामुळेच ही हत्या झाल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला.


अवादा कंपनीकडून देण्यात येणाऱ्या खंडणीला अडथळा ठरत असल्यानेच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याचे एसआयटीने न्यायालयात माहिती देताना सांगितले. त्यामुळे, याप्रकरणाच्या आणखी तपासासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची असल्याचं सांगत आरोपीची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. त्यानुसार, वाल्मिक कराडला 7 दिवसांची न्यायालयीने कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या का केली?

सीआयडी आणि एसआयटीने कोर्टात मोठा दावा केला. वारंवार अवादा कंपनीकडे खंडणी मागितली. पण कंपनीने दिली नाही. यावेळी संतोष देशमुख अडथळा ठरले म्हणून आरोपींनी त्यांची हत्या केली. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही कंपनीने त्यांना खंडणी दिली नव्हती. अवादा कंपनीची बाजू घेत संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केली, असा दावा सीआयडीने आणि एसआयटीने कोर्टात केला. एसआयटीच्या रिमांड रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.

वाल्मिक कराडची अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी

या प्रकरणात अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनादेखील वाल्मिक कराडने धमकी दिल्याचं याधीच स्पष्ट झालं आहे. अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड याने थेट धमकी देत 2 कोटींची खंडणी मागितली होती. त्याच्या कार्यालयात बोलवून शिवाजी थोपटे यांना धमकी देण्यात आली होती.