मुंबई (प्रतिनिधी) : लालपरीचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी खूप सोयीचा आहे. एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात अनेक बस दाखल केल्या आहेत. यामध्ये शिवशाही, शिवनेरी, एसी बससारख्या अनेक बस खेडोपाड्यात धावत असतात. मात्र, आता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातून आता शिवशाहीचा प्रवास संपणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या बसच्या वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने शिवशाही बसची सेवा थांबविण्याचा निर्णय घेऊ शकतात. शिवशाही बस गाड्यांमध्ये तांत्रिक दोष असल्याचे निष्पन्न झाल्यावर प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते. शिवशाही बसच्या अंतर्गत व बाह्य रचनेत आवश्यक तो बदल केला जाणार असून त्याचे रूपांतर साध्या अर्थात ‘लालपरी’ बसमध्ये होणार असल्याची शक्यता आहे.
अलीकडेच गोंदिया येथे शिवशाही बसच्या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यापूर्वीदेखील शिवशाही बसचे अपघात झाले होते. शिवशाही बसचे होणारे अपघात पाहता आधापासून त्यात तांत्रिक दोष असल्याचे समोर आले आहे. वारंवार तक्रारी वाढल्याने एसटी प्रशासनाच्या वाहतूक विभागाने शिवशाहीला सेवेतून काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यातच शिवशाहीचा प्रवास संपणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.