कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर मधून मधुरिमा राजे छत्रपती यांनी उमेदवारी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागं घेतलाय. यावरती खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपलं मत व्यक्त केलयं.

काय म्हणाले शाहू महाराज छत्रपती..?

या प्रसिद्धी पत्रकात शाहू महाराज छत्रपती म्हणाले की, काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना नाराज करून निवडणूक लढवणं मान्य नसल्यानं कोल्हापूर उत्तर मतदार संघातून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मागं घेण्यात आलीयं.

एका कुटुंबात दोन पदं नकोत म्हणून मधुरिमाराजेंनी निवडणूक लढवायची नाही असं आमचं आधीच ठरलं होतं. त्यामुळं त्या काँग्रेसच्या मुलाखतीसाठीही गेल्या नव्हत्या. राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोध होऊ लागल्यावर एका विशिष्ट परिस्थितीत अनेकांच्या आग्रहास्तव काँग्रेस पक्षाची गरज म्हणून त्यांनी उमेदवारी स्वीकारली होती.

लाटकर यांनी उमेदवारी मागं घेतली तरच लढायचं असं आमचं ठरलं होतं आणि लाटकर कुटुंबियांसोबत झालेल्या चर्चेतही आम्ही त्यांच्याजवळ ही गोष्ट स्पष्ट केली होती. लाटकर यांच्याशी झालेल्या भेटीचा वृत्तांत पक्षनेतृत्वाला दिला होता. त्यांनी माघार न घेतल्यामुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखावा म्हणून अखेरच्या क्षणी आम्ही माघारीचा निर्णय घेतलायं.

काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसला तरी राजेश लाटकर काँग्रेस विचारांचं पर्यायानं काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व ताकदीनिशी प्रयत्न करणार आहोत.

आमदार सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचं नेते आहेत. राज्य पातळीवर नेते म्हणून ते उत्तम काम करतायत. त्यांना ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळं कोल्हापूर उत्तर मध्ये राजेश लाटकर यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसच्या अन्य चार जागा तसचं महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकण्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करणार आहोत.

माघारीनंतरच्या घटनांमध्ये आमदार सतीश पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केलायं. कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झालायं, असा कांगावा करतायत. प्रत्यक्षात आमदार सतेज पाटलांकडून तसं काहीच घडलेलं नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीयेत. माघारीच्या घटनेनंतर आम्ही भुदरगड च्या कार्यक्रमात एकत्र होतो आणि तिथूनच एकाच गाडीतून परत आलोय.

विधानसभा निवडणुकीच्या माघारीनंतर काही लोक सोशल मीडियावर मी खासदारकीचा राजीनामा देणारायं अशा अफवा पसरवतायत. त्यात अजिबात तथ्य नाहीये. कोल्हापूरच्या साडेसात लाखांहून अधिक लोकांनी मला विक्रमी मते देऊन निवडून दिलय. कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेत मी काम करतोय आणि काँग्रेसचा महाविकास आघाडीचा खासदार म्हणून लोकांची सेवा करीत राहणाराय असंही शाहू महाराज छत्रपती म्हणाले आहेत.