पुणे : पंढरपुरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार आहेत. यामध्ये साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो. यंदा शरद पवार या वारीत सहभागी होणार आहेत. त्यांच्या सोबत काँग्रसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे ह.भ.प. भारत महाराज जाधव, मार्मिक साप्ताहिकाचे संपादक मुकेश माचकर, कवी अरुण म्हात्रे, आदी मान्यवर सहभागी होणार आहेत अशी माहिती शामसुंदर महाराज सोन्नर यांनी दिली.
7 जुलैला ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ उपक्रम
‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम गेली दहा वर्षे राबविला जात आहे. यंदाचे अकरावे वर्ष असून शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली आणि शरद कदम, अविनाश पाटील, वर्षा देशपांडे, सुभाष वारे, राजाभाऊ अवसक, विशाल विमल, दत्ता पाकिरे यांच्या पुढाकाराने याचे आयोजन केले जाते. यंदा संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात 7 जुलैला ही मंडळी बारामती ते सणसर हे अंतर चालणार आहेत. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी शामसुंदर महाराज सोन्नर, सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांनी सोमवारी 17 जूनला मुंबईतील ‘सिव्हर ओक’ या शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.
वारीतील विचार, शिस्त, बंधूभाव, समता हा विचार ही मंडळी ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ यात सहभागी होऊन दिवसभर चालून समजून घेतात. या दरम्यान दुपारच्या विसाव्यापर्यंत काही निवडक लोक आपले अनुभव कथन करतात. याची माहिती शरद कदम यांनी शरद पवार यांना दिली. “उपक्रम अत्यंत स्तूत्य असून सामाजिक एकोपा निर्माण होण्यासाठी फार महत्वाचा आहे, असे शरद पवार म्हणाले. या उपक्रमात या वर्षी मी सहभागी होईल, असेही ते म्हणाले”. या उपक्रमात महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



