मुंबई (प्रतिनिधी) : पेहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणे उद्धस्त केली. यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमारेषेजवळील गावांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्य दलाचे 2 जवान शहीद झाले आहेत. यातील मुरली नाईक हे मुंबईतील घाटकोपरचे रहिवासी होते. ते मूळचे आंध्र प्रदेशचे होते.

शहीद जवान मुरली नाईक यांना 9 मे रोजी पाकिस्तानशी लढताना वीरगती प्राप्त झाली. यानंतर संपूर्ण शहरावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. तसेच देशभरातून हळहळ व्यक्त केली जातेय. पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना भारतीय सैन्याचे दुसरे जवान दिनेश शर्मा यांनाही वीरमरण प्राप्त झाले. गोळीबारात जखमी झाल्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.